महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

स्वराज्याचे वैभव | गडकिल्ले

By Sonu Balgude Views: 3555 3 Min Read

स्वराज्याचे वैभव | गडकिल्ले

अखंड शौर्याचे, पाराक्रमाचे साक्षीदार अन शिवरायांच्या व शंभूराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले स्वराज्यातील गडकिल्ले. किती अनन्यसाधारण महत्व होते गडकोटांचे स्वराज्यात. पण आज महाराष्ट्राचे एके काळचे वैभव. त्यातील काही आज अखेरच्या घटका मोजत आहेत तर काही किल्ले नादान तरुणांच्या चुकीच्या कृत्यांचे साक्षीदार होत आहेत.

एक काळ होता त्यावेळी गडकिल्ले मुघलांच्या तोफांच्या हल्ल्याने घायाळ व्हायचे,
पण आज नादान स्वकीयांच्या हल्ल्याने गडकिल्ले घायाळ होत आहेत.
शिवरायांनी एवढे गडकिल्ले बांधले,
पण एकाही गडाला आपले किंवा कोण्या नातेवाईकाचे नाव दिले नाही, मग तुम्ही आम्ही कोण आहोत त्या पावन गडकोटांवर आपले अन आपल्या प्रेयसीचे नाव लिहायला.
लोकांचं एवढं प्रेम उतू जात असेल एकमेकांवर तर रेशन कार्ड अन सातबाऱ्यावर नाव टाका,
माझ्या राजाच्या गडांची ही घोर विटंबना कशासाठी.

जे गडकोट आपल्या बापजाद्यानी रक्त सांडून, आपल्या प्राणाची आहुती देऊन राखले त्याच गडकिल्ल्यांवर आज अशी अवस्था, अशी प्रतारणा.
शिवकाळात गडकिल्ले म्हणजे सगळ्यात सुरक्षित ठिकाण समजलं जायचं, आयाबहिणींना तिथे कसलाही धोका नसायचा,
पण दुर्दैवाने आज तिथेच जोडपी अश्लील चाळे करत फिरतात.

काल येताना तुळापूरला सुद्धा जाणे झाले,
शंभुराजांना मुजरा घालून त्या तीन नद्यांच्या पावन संगमाकडे निघालो असता धक्कादायक दृश्य पाहिली.
ज्या जागेवर आपल्या राजाला हाल हाल करून मारलं गेलं, जिथे शंभूराजांनी धर्मासाठी बलिदान दिले अशा जागी जोडप्याना प्रेम करायची जागा कशी वाटू शकते. थोडी तरी भावना ठेवा रे, आपण महाराष्ट्रात जन्मलो याचा थोडा अभिमान बाळगा. तुमच्या प्रेमाला विरोध करण्याचा मला अधिकार नाही अन तो मी करणारही नाही, पण जर तुम्ही अशा पवित्र स्थळांचे पावित्र्य भंग करणार असाल तर वेळीच सुधारा.

काल मला खूप मला वाईट वाटलं, मला रागही आला,
अस वाटलं काहीतरी समजून सांगावं यांना,
पण मीच मूर्खात निघालो असतो हे मला ठाऊक होते, त्यामुळे नाईलाजाने गप्प बसावे लागले.
अशा पवित्र स्थळांचे महत्त्व आपण कधी समजणार.

तो बेल्जियम चा अवलिया, पीटर भाऊ,
त्याला या सह्याद्रीच महत्त्व कळलं,
तो ह्या सह्याद्रीच्या प्रेमात पडला. चार महिन्यात 200 गड चढण्याचा अट्टहास त्याने केला, आणि त्याचे 77 गड जवळपास पावणेदोन महिन्यात पाहून झाले. त्या परदेशी पाहुण्याला याची किंमत अन महत्व कळलंय.
अन आपण या मातीत जन्म घेऊन सुद्धा षंढ झालो.
यावर नक्कीच विचार करण्याची वेळ आली आहे.
हे नक्कीच कुठेतरी बदलायला हवं.

एक काळ होता की या अभेद्य अन बुलंद गडकोट त्यांच्यावर चालून येणाऱ्या शत्रूची झालेली नाचक्की अन अवस्था पाहून नक्कीच खदाखदा हसले असतील,
परंतु आज जे गडावर दारू पिणे, विडी सिगारेट ओढणे, पुड्या खाणे, नावे लिहणे, अश्लील चाळे करणे हे सगळं सोसून तेच गडकिल्ले आज नक्कीच आसवं ढाळत असतील. त्या गडकोटांसाठी रक्त सांडलेले मावळे जेव्हा वरून बघत असतील ना नक्कीच डोक्यातून टीप गाळत असतील..

कृपया गडकिल्ल्यांच पावित्र्य कधीही भंग करू नका, आमचं सह्याद्री प्रतिष्ठान श्रमिक सरांच्या मार्गदर्शनाखाली गडाचं अन ऐतिहासिक वास्तूंचे जमेल तेवढं संवर्धन करतंय, तुम्हाला कोणाला संवर्धन नसेल करायचं तर निदान त्या गडांची विटंबना तरी करू नका एवढीच विनंती. जय शिवराय जय गडकोट

माहिती साभार – सोनू बालगुडे पाटील

खांदेरीचा रणसंग्राम

Leave a comment