खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग ३

खानदेश | यादवकालीन खानदेश भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११ | खानदेशातील स्वातंत्र्यसंग्राम | खानदेशातील अश्मयुगीन स्थळे | खानदेशातील सूफी साधू - फकीर | महानुभाव पंथ आणि खान्देश | खानदेशातील प्रागैतिहासिक काळ

खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग ३ –

पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या पावलावर पाऊल ठेवून अमळनेरला १७ जुलै रोजी १९०८ मध्ये मोतीलाल माणेकचंद तथा प्रतापशेठ यांच्या औदार्याने खानदेश एज्युकेशन सोसायटी जन्माला आली. टिळकांची स्वदेशी चळवळ ऐन भरात असताना या चतु:सूत्रीला  स्वराज-स्वदेशी- राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार यास खतपाणी घातले, ते वासुदेव महादेव भावे यांनी होय. टिळकांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली या बातमीने जनक्षोभ उसळला आणि जळगाव, भुसावळ, पाचोरा व अमळनेर तसेच धुळे जिल्हयात हरताळ पाळण्यात आला.(खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग ३)

पुढे १९१६ मध्ये होमरूल चळवळीचा प्रारंभ झाल्यानंतर टिळकांनी पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यातील दौरा केला आणि सुशिक्षित मंडळींचा पाठिंबा मिळाला. डिसेंबर महिन्यात लखनौ कॉंग्रेसला जातांना चाळीसगाव, जळगाव, अमळनेर व भुसावळ तसेच धुळे जिल्ह्यातील बरीच मंडळी टिळकांबरोबर गेले होते.

एरंडोल येथील वामनराव काळकरांचे “प्रागतिक” नियतकालिक टिळकांच्या कार्याचा प्रसार करत असे. भुसावळ येथील वा. वि. दास्ताने वकिल १९१६ पासून पुढे आले आणि भुसावळ तालुक्यातील राजकारणात पुढाकार घेऊ लागले. होमरूल चळवळ व्यापक करण्यासाठी तसेच होमरूल विचारानुसार गावोगावी लवाद न्यायालये स्थापन केली. पुढे १९१९ मध्ये अमृतसर काँग्रेसचे अधिवेशनात हजर राहून राजकारणात नीट समजून घेतले आणि महात्मा गांधी यांच्याशी ओळख झाली.

चाळीसगाव येथील बापुराव तपस्वी, बाबुराव घाटे व विनायक परशुराम भागवत हे काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते होते. टिळकांनी पुरस्कार केलेली “पुर्व खानदेश जिल्हा परिषद” दास्तानेंच्या पुढाकाराने १९१८ मध्ये संघटीत झाली. या परिषदेत अधिवेशनात अध्यक्ष होते, र. पां. करंदीकर तर मे महिन्यात १९२० मध्ये चाळीसगाव अधिवेशनात ल.ब.धोपटकर यांचे मार्गदर्शन लाभले. या सुमारास धुळ्याच्या विष्णू सीताराम रणदिवे यांचा प्रभाव जळगाव जिल्ह्यातील राजकीय विचारांवर पडला होता.

१८९९ मध्ये पुणे जिल्ह्यातील ओतूरच्या दोन सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी खानदेशात या चळवळीची सुरुवात केली. सत्यशोधक जलसे पुढे १९२१-२३ मध्ये आले तरी लोक जलसे बघायला जात असत. पण विचारांचा फारसा प्रभाव दिसून येत नाही पण जेव्हा सीताराम नाना चौधरी, डोंगरसिंग पाटील हे आपल्या प्रभावाने विचार मांडू लागले तेव्हा फरक होत गेला.

१९२३ मध्ये खिरोद्यांचे सीताराम नाना आपले विचार “आत्मोध्दार”  यात आपले विचार सडेतोडपणे मांडत असत.(भारतीय पत्रकारीता कोश) या पत्रामुळे जळगाव शहर, चाळीसगाव, पाचोरा, पारोळा, भडगाव परिसरात बराच प्रभाव दिसून येतो. सत्यशोधक समाजाच्या सारखी दलित समाजाची चळवळ फार उशीरा, ती ही सावदा येथील भारतीय बहिष्कृत समाज परिषद ही एप्रिल महिन्यात १८-२९ तारखेला १९२१ साली भरली होती. (य.दि.फडके, विसाव्या शतकातील महाराष्ट्र खंड ३)  त्यानंतरच्या काळात २९ सप्टेंबर १९२५ रोजी बहिष्कृत समाजाची परिषद ही माधव गणपत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बहाळ येथे झाली. स्थानिक पत्रकार मेढे यांनी सुरू केलेल्या तरूण बहिष्कृत साप्ताहिक अगदी अल्पकाळ दलितांच्या दुःखाला वाचा फोडत होते.

माहिती संकलन  –

खानदेशातील स्वातंत्र्यसंग्राम भाग २

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here