महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

खानदेशातील स्वातंत्र्यसंग्राम भाग १

By Discover Maharashtra Views: 2671 5 Min Read

खानदेशातील स्वातंत्र्यसंग्राम भाग १ –

रेल्वे सुरू झाल्यावर नवीन जागृती सुरू झाली जळगाव शहराचा आर्थिक विकासाबरोबरच खानदेश कापड गिरणी चा पाया घातला गेला. १८६४ मध्ये नगरपालिका स्थापन करण्यात आली. मुंबई हून येणाऱ्या नियतकालिकांच्या बरोबर जळगाव येथे प्रबोधचंद्रिका हे साप्ताहिक १८८१ मध्ये सूरू झाले. त्यामुळे वैचारिक प्रबोधनाला चालना मिळाली. जळगावला व्हर्नाकुलर शाळेची स्थापना १८८६ झाली आणि पाश्चिमात्य शिक्षण प्रसाराला सुरूवात झाली. खानदेशाचे १८०६ मध्ये विभागणी केली गेली. पुर्व खानदेश व पश्र्चिम खानदेश असे दोन भाग केले आणि धुळे जिल्हा आणि जळगाव जिल्हा असे दोन जिल्हे तयार झाले.(खानदेशातील स्वातंत्र्यसंग्राम)

पुण्याच्या पुना असोसिएशन चे पुर्नगठण करून पुना सार्वजनिक सभेच्या रूपाने जनतेवरील अन्यायाविरुद्ध एक व्यासपीठ तयार झाले. सभेचे कार्यकर्ते सभा घेऊन जनतेला अन्यायाची जाणीव करून देत असत. या सभेने जमिन महसूल आकारणी मध्ये होणाऱ्या अन्याय हा विषय हाती घेतला. १८९६ मध्ये दुष्काळ असताना साराबंदी मोहिमेला खानदेशात नाट्यमय प्रतिसाद मिळाला. येथे १८५२ मध्येही शेतकरी लोकांनी उठाव केला होताच. एरंडोल, अमळनेर व धुळे तालुक्यांत सभेच्या कार्यकर्त्यांनी साराबंदी चळवळ बरीच पसरवली.

लोकमान्य टिळकांची ही चळवळ दडपण्यासाठी सारा भरण्यास नकार देणाऱ्या मोठे शेतकरी, मारवाडी, व वाणी सावकारांच्या जमिनी जप्त करण्याचा सपाटा सरकारने लावला. जानेवारी १८९७ मधील ही घटना आहे. सूचना न देताच जप्ती हुकुम काढण्यात येत. बड्या शेतकऱ्यांना बसलेली झळ बघून लहान शेतकरी भयभीत होत असत. केवळ दहशतीमुळे गरीब शेतकरी आपले देणे देण्यासाठी चावडीवर जमू लागले. भितीपोटी हाल अपेष्टा सोसत त्यांनी महसूल देऊन टाकला.आणि सरकारने वार्षिक सरासरी पेक्षा जास्त महसूल गोळा केला. (संदर्भ: रिचर्ड कॅशमन, दि मिथ आॉफ लोकमान्य,:टिळक ॲड मास पोलिटिक्स इन महाराष्ट्र)

ल्याल फॅमिन कमिशनर यास देखील ही वस्तुस्थिती आढळली. सार्वजनिक सभेला पराभूत करणे हा सरकारचा हेतू होता. म्हणून फेब्रुवारी १८९७ पासून सभेच्या बैठकीत शेतकरी येईनासे झाले.

अन्यायाविरोधात जनतेला जागृत करणे हे अवघड काम असते हेच लक्षात येते.

‘खानदेशमधील राष्ट्रवादाचा उदय आणि विकास’ म्हणजे खानदेशचा इतिहास हे डॉ. जी. बी. शहा यांचे पुस्तक होय. हा ग्रंथ म्हणजे नुसता घटनाक्रमांचा धांडोळा नाही तर, खानदेशच्या विकासात अन् जडणघडणीत श्वास होऊन जगलेल्या क्षणांचा अज्ञात इतिहासही या पुस्तकातून समोर येताना दिसतो. राजकीय चळवळींबरोबर सत्यशोधक चळवळ, गुला महाराजांचे भिल्लांतील प्रबोधन, मंदिर प्रवेशाची चळवळ, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी झालेले प्रयत्न, हिंदुस्थानातील ग्रामीण भागात काँग्रेसचे प्रथमच भरलेले फैजपूरचे अधिवेशन व त्यात शेतकऱ्यांसंबंधी झालेले ठराव आदी अनेक गोष्टींचा आढावा ओघाने आला आहे. खानदेशमध्ये मोठ्या प्रमाणात भिल्ल व आदिवासी लोक आहेत. त्यांनीच पहिल्या प्रथम ब्रिटिश सत्तेला खानदेशच्या भूमीवर विरोध केला. म्हणून खऱ्या अर्थाने ते महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक होत. काझीसिंग, कन्हैया व भागोजी नाईक आदी भिल्ल क्रांतिकारकांनी १८५७ च्या उठावात भाग घेऊन खानदेशमध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटविण्याचा प्रयत्न केला. अशा वंचित नि उपेक्षित जनता व प्रदेशाचा इतिहास उजेडात आणण्याचा प्रयत्न म्हणजे डॉ. शहा यांचे हे पुस्तक होय. खानदेश स्तोत्र, नावाची व्युत्पत्ती, विस्तार, अभ्यासाची साधने, प्रकाशित, अप्रकाशित साधनांवरही टाकलेला प्रकाश अभ्यासकांना मार्गदर्शक ठरतो. खानदेशमधील भिल्ल, शेतकरी आणि १८५७ च्या उठावावर टाकलेला प्रकाश खानदेशची महती दाखवितो. खानदेशामधील प्रारंभीच्या काळातील चळवळींचे ज्ञात-अज्ञात पैलू थक्क करतात. तर राजकीय दृष्ट्याही खानदेशचे महत्त्व लक्षात येते. असहकाराची चळवळ, महात्मा गांधीजींचा खानदेश दौरा, सविनय कायदेभंगाची चळवळ अन् स्थानिक तरूणांची का‌मगिरी, सत्यशोधक व फैजपूरचे काँग्रेस अधिवेशन, १९४२चे चले जाव आंदोलन तसेच अस्पृश्यता, सामाजिक बहिष्कार, साने गुरूजी, जैन तीर्थक्षेत्रांचे व समाजाचे योगदान, स्वातंत्र्यवीर सावरकर, सरदार वल्लभभाई पटेलांचे दौरे अशा अनेक विषयांच्या माध्यमातून डॉ. शहा यांनी खानदेशच्या इतिहासाचे पुनर्लेखन केले आहे. हे करत असतानाच तेथील राष्ट्रवादाचा उदय आणि विकासाची ऐतिहासिक सफरही ते घडवितात.

कॉंग्रेसच्या स्थापनेपासून तसेच पुणे, मुंबई येथे शिक्षणामुळे नविन पिढीतील तरूण जागरूक होऊ लागले होते.त्यामुळे जळगाव हे वैचारिक केंद्र तयार झाले.राष्ट्रीय कॉंग्रेस ला पाठवण्यासाठीच्या सभा ह्या सरकारी धोरण झुगारून जळगाव नगरपालिकेच्या कार्यालयात होत असत. अशी सभा १९०८ मध्ये झाल्याची नोंद आहे. तत्कालीन लोकनियुक्त सभासद आणि नगरपालिकेच्या अध्यक्ष आ.रा.म्हाळस यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा होऊन अनेक प्रतिनिधी काॅंग्रेससाठी निवडले गेले होते.(खानदेशातील स्वातंत्र्यसंग्राम)

संदर्भ: महाराष्ट्र राज्य गॅझेटियर जळगाव जिल्हा १९९४.

माहिती संकलन  –

खानदेशातील स्वातंत्र्यसंग्राम भाग २

Leave a comment