धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९

.जिजाऊंनी शंभूबाळांना उचलून आपल्या मांडीवर घेतले. त्यांच्या मांडीवर शंभू होते, डोळ्यांसमोर प्रतापगड होता आणि मनात होती राजांची मुद्रा आणि चिंता!

राजांनी पाठविलेला निकराचा थैलीस्वार राजगडावर आला. जिजाऊंचे खाजगीचे कारभारी खलित्याचा मजकूर वाचून दाखवू लागले… “अखंड सौभाग्यमंडित मातुश्री – आऊसाहेब, प्रति त्रिकाल चरणी मस्तक ठेवून सिवबाराजे यांचे दंडवत उपरी विशेष – खान फौजेसमेत कोयनाखोरीत तळ देऊन आहे. उदईक खानासवे भेटीचा प्रसंग पडला आहे. आम्हास आशीर्वाद द्यावा. शंभूबाळांना जपावे. ”

जिजाबाई, “जगदंब, जगदंब ‘ पुटपुटल्या. शंभूबाळांना हात हाती धरून गडाच्या तटबंदीवर आल्या. प्रतापगडच्या रोखाने नजर जोडून त्या वेड्यासारख्या पाहू लागल्या.
त्यांचे मन सुन्न झाले होते.

त्या काहीच बोलत नाहीत म्हणून बाळराजांनीच त्यांना विचारले, “आबा खानाच्या भेटीला गेलेत. मग ते त्याला घेऊनच का नाही येत इकडे? ”

जिजाबाईनी चमकून शंभूकडे पाहिले. “साखर पडो तुमच्या तोंडात” म्हणत जिजाबाई तटबंदीवरून महालाकडे परतल्या. मावळतीला कलतीला लागलेल्या सूर्याने आभाळाचा पोटला फोडला होता! क्षितिजकडा लाल-लाल झाली होती.

प्रतापगडाच्या पायथ्याशी जनीच्या टेंब्यावर खानाच्या भेटीसाठी ऐसपैस शामियाना अण्णाजी मलकऱ्यांनी उभा केला होता. पषष्ठीच्या रात्री खानभेटीचा खल करण्यासाठी निवडक असामींसह राजांचे खलबत बसले. नेताजी पालकर, कान्होजी जेधे, मोरोपंत पिंगळे, येसाजी कंक, बाबाजी भोसले, बाळाजी सिलीमकर, पंताजी गोपीनाथ
अशा असामींनी राजांच्याभोबती बैठकीचा फेर धरला. साऱ्यांचे मळवट भंडाऱ्याने भरले

निर्धाराच्या सावध घोगऱ्या आवाज राजांनी खलबताला तोंड फोडले –

““उदईक खानाचे भेटीसाठी आम्ही तिसऱ्या प्रहरी गड उतरणार आहोत. खानाच्या मनी आम्हास जीवे मारावे ऐसे कपट दबा धरून बैसले आहे.

“ये समयी समस्तांनी एकदिलाने हिंमत बांधली तर कुल फौजेसह खान बुडतोच आहे. आम्ही नेमून देतो आहोत ती कामगिरी अवघे कान देऊन चित्ती धरा. कार्यी कुसूर
करू नका.

“मोरोपंत, तुमच्या पायदळानिशी तुम्ही पारघाटात किनेश्वराच्या खोऱ्यावर डोळ्यांत तेल ठेवून दब्यानं बसा.

“कान्होजीबाबा, तुमच्या बांदलांचा जमाव आणि पासलकरांचे कोटबंद धारकरी घेऊन तुम्ही अण्णाजी दत्तोसमवेत खान येतो, त्या वाटेभोवती अंगचोरीने जागा धरा.

“बाळाजी आणि हैबतराव, तुमचा हत्यारबंद मावळा खानाच्या पाराजवळच्या तळाला घेऊन रातोरात गर्दाव्यात पेरा.

“बाबाजीराजे, तुमचा पाऊलोक वबाई-जावळीच्या बगलेस खानाच्या फौजेच्या पिछाडीला परतीच्या वाटा रोखण्यासाठी जागता ठेवा.

“नेताजीराव, तुमचे खुरचलाख घोडदळ कुडसराच्या पठारावर जीनतैय्यार ठेवा. खानाचा वाईत ठाण झालेला चंदाबलीच्या कुमकेचा तळ तुम्हास बुडविणे आहे.

“तान्हाजीराव, कृष्णाजी कंक तुम्ही निवडक, चखोट पटेकरी संगती घेऊन भेटीच्या शामियान्याजबळ दरडीला धरून खणलेल्या चरात उतरा.

“संभाजी कावजी, जिऊ महाला, कोंडाजी आणि येसाजीकाका, संभाजी करवर, काताजी इंगळे, विसाजी मुरुंबकर, सुराजी काटके, सिद्दी इब्राहीम आणि कृष्णाजी
गायकवाड हे दहा धारकरी आमच्या संगती गड उतरतील.

“जगदंबेच्या आशीर्वादे आम्ही खानास जीवे घेतला, तर तटमाचीवर इशारतीसाठी तोफांच्या भांड्यांचे तीन बार होतील. कमनशिबाने आम्हास दगा झालाच तर इशारतीची पाच भांडी वाजतील.

“आम्ही सलामत आलो ना आलो, तरी साऱ्यांनी हिंमत धरोन कोयनाखोरीच्या कैचीत फसलेला खान कुल फौजेसह बुडवावा! ये कामी कुचराई करेल, शकअंदेश मनी धरेल त्यास मळवटीच्या जगदंबेच्या भंडाऱ्याची आण!

“पक आम्ही जातो म्हणोन दिल टाकू नका. हे श्रींचे देवधर्माचे राज्य उभे करणे आहे. त्यासाठी प्रसंग पडला तर कैक सिवाजीराजे खर्ची घालावे लागतील.

“आम्ही सलामत आलो नाहीच, तर आमच्या शंभूबाळांना सामोरे घाला. आमच्या ठायी त्यांना समजोन नेताजीरावांच्या पोख्त मसलतीने अवघे मिळोन श्रींच्या
राज्यासाठी कस्त करा! आशीर्वादासाठी मासाहेबांचे हातबळ तुमच्या पाठीशी आहेच! ”

जिजाऊंच्या आणि शंभूबाळांच्या आठवणीने राजांचा आवाज घोगरा झाला. काळीज भरून आले. प्रतापगडावरचे खलबत उठले. टेंभ्यांच्या मंद प्रकाशात राजांनी साऱ्यांची गळाभेट घेतली. नेताजीराबांनी पुढे होत खलबतखान्याच्या आतून तोंडावरच्या दगडी धोंडेवर कमरेच्या तलवारीच्या मुठीने तीन ठोके दिले. बाहेरून धोंड हटविण्यात आली. राजांनी मुजरे करून सारे जोडून दिलेल्या कामगिरीचा विचार करीत गड उतरू लागले. त्यांना धीर द्यायला कपाळावर फक्त भवानीचा भंडारा होता. आभाळातीलषष्ठीची चंद्रकोर पांढऱ्या-भुरक्‍्या ढगांनी पार-पार झाकळून टाकली होती!!

राजे आपल्या खाजगीच्या महालात आले. तबकात टोप उतरून ते मंचकावरच्या बिछायतीवर आडवे झाले. शंकाकुशंकांनी त्यांच्या मनात फेर धरला. ‘खरोखरच खानानं या भेटीत काही दगा केला तर!… आमच्या या नव राज्याचं काय होईल? मासाहेबांचीस्थिती होईल? आणि शंभूबाळ? आपल्या आऊंना मुजरा करण्यासाठी आभाळाची दौड घेण्याची भाषा करणारा तो पोर आमच्यासाठी आऊसाहेबांना हेराण- हैराण करील!
आमचा ठावठिकाणा धुंडण्यासाठी एकटाच गड उतरील. बाळशंभू, खरंच… खरंच तुम्ही आप्तगणांकडून फसले जाण्यासाठीच तर नाही आलात? ‘

बाळराजांच्या आठवणीने राजांच्या डोळ्यांसमोर सईबाईंची सावळी मुद्रा उभी ठाकली. त्यांचे काळीजकैची घालणारे अखेरीचे बोल याद आले – “आमचे शंभूबाळ – एकला जीव! आज स्वारींच्या पदरी घातला! ”

राजे पुरते बेचैन झाले. त्यांना काही-काही सुचत नव्हते. कूस पालटली तरी विचार काही बदलत नव्हते. छातीवरच्या माळेतील कवड्या डोंगराएवढा आकार घेऊन
छाती दडपून टाकताहेत असे वाटत होते.

“श्रींचे राज्य! देवाधर्माचे राज्य. त्यासाठी खर्ची पडलेले इमानबंद जीव! हयातीची होलपट हसतमुखाने सोशीत आलेल्या आऊसाहेब! जिंदगीच्या उंबरठ्यावरच टोप मस्तकीबसलेले शंभूबाळ!! ‘

घायाळ-घायाळ झालेले राजे कसल्यातरी विचाराने टाच भरल्यासारखे तडक उठून मंचकावर बसले. महालाच्या दरवाजापर्यंत जाऊन त्यांनी पहारेकऱ्याला साद
घातली – “कोण आहे? ”

“जी,” म्हणत पहारेकरी महालात आला आणि कमरेत वाकला.

“हिरोजीला याद फर्माव.” राजांनी त्याला तसाच परतविला.

त्याने धावत जाऊन हिरोजीला वर्दी दिली.

हिरोजी फर्जंद राजांच्यासमोर मुजरा करून अदबीने उभा राहिला.

“हिरोजी, डोळ्यास डोळा लागत नाही. केदारेश्वराचं दर्शन घ्यावं म्हणतो. आमच्या संगती चल. ”

जी,” म्हणत हिरोजी महालाबाहेर पडला. पुढे जाऊन त्याने केदारेश्वराच्या पुजाऱ्याला उठविले.

राजांनी अंगाभोवती शाल लपेटून घेतली. टेंभे धरलेले दोन धारकरी, बेलपत्राचे तबक घेतलेला केदारेश्वराचा पुजारी आणि हिरोजी फर्जंद यांच्यासह राजे केदारेश्वराच्या
दर्शनाला चालले.

क्रमशः………..!

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here