महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

कराड येथील पंतप्रतिनिधी चा भुईकोट

By Discover Maharashtra Views: 2628 3 Min Read

कराड येथील पंतप्रतिनिधी चा भुईकोट –

सातारा जिल्ह्यातील कृष्णा आणि कोयनेच्या संगमावर वसलेले पौराणिक इतिहास लाभलेले कऱ्हाड या गावी बहामनी राजवटीत एक प्रचंड मोठा भुईकोट बांधला गेला. कराड येथील भुईकोट किल्ला एकेकाळी कऱ्हाडचा किल्ला म्हणून ओळखला जात असे. शहराच्या साधारण वायव्य दिशेकडे सुमारे८४ चौरस मीटर क्षेत्रावर उंच जागी या किल्ल्याचे काही अवशेष(नाममात्र) पहावयास मिळतात. पुढे हा किल्ला थोरल्या शाहु महाराजांच्या काळात प्रतिनिधींच्या ताब्यात आला.

आज किल्ल्याचे दोन बुरुज कसे तरी आपले अस्तित्व टिकवून उभे आहेत. तटबंदीचे अवशेष चोहो बाजूला भग्नावस्थेत पहावयास मिळतात किल्ल्यातील प्रतिनिधी वाद पूर्णपणे उध्वस्त झालेला दिसतो

१९९९ साली प्रसिद्ध झालेल्या सातारा जिल्हा गॅझेटमध्ये त्याचे स्थूल मानाने वर्णन लिहलेले दिसते.त्यावेळी मुख्य प्रवेशद्वार आणि त्यास घट्ट पकडून ठेवणाऱ्या दोन बुरुजांचे अवशेष बऱ्यापैकी शिल्लक आहे. चौरस आकाराचा हा किल्ला ईशान्यकडे थोडासा पुढे आलेला होता.किल्ल्याला १८ बुरुज होते.दगडमातीच्या प्रचंड तटबंदीला जंग्या होत्या. भोवताली सुमारे २ मीटर खोलीचा खंदक होता.कोयना नदीच्या पात्रापासून १४ ते ३० मीटर उंचीवर हा किल्ला एके काळी भुईकोटांचा जणू राजा दिसावा या थाटात कऱ्हाडचा भूमीवर राज्य करणारा चालुक्य,राष्ट्रकूट, शिलाहार यांच्या वैभवाचे दर्शन घडवीत होता.

किल्ल्यातील प्रतिनिधी वाडा म्हणजे मराठकालीन वास्तुशैलीचे एक अप्रतिम उदाहरण होते.वाड्याच्या दक्षिणेस २५×९|| मी.लांब रुंद व ४ मी.उंच असा दरबार हॉल होता.त्याच्या दोन्ही बाजूंना स्वतंत्र दालने होती व पूर्वेस भवानी देवीची छत्री होती.आजही आपणांस ते मंदिर पहावयास मिळते. मंदिरातील मूर्तीचे मूळ अधिष्ठान हे १३ व्या शतकातील असावे असे मानले जाते. दरबाराचा तक्तपोशिवर जाळीदार नक्षीकाम होते.असे म्हटले जाते की,सण १८०० च्या सुमारास परशुराम श्रीनिवास प्रतिनिधींच्या मातोश्री काशीबाई यांनी या वास्तूच्या बांधकामास सुरुवात केली व वडिलांनी ते काम पूर्ण केले.

आज किल्ल्याच्या परिसरात स्लॅबची घरेच घरे झालेली दिसतात. त्यामुळे कालांतराने किल्ला येथेच होता का हा प्रश्न अभ्यासकांच्या पुढे उभा राहील.कोयना पात्रालगतची तटबंदी१८७५ च्या महापुरात नष्ट झाली असावी.

किल्ल्यातील बारव-किल्ल्यात एक अप्रतिम अशी पाय विहीर आहे. तिला “नकट्या रावळ्याची विहीर” असे म्हणतात. ही विहीर कोटाच्या पश्चिम टोकाला असून कोयनेच्या पात्रापासून सुमारे ७५ फूट उंचीवर आहे.विहिरीची लांबी १२०×९० फूट लांबी रुंदीच्या पायऱ्यांच्या चोहोबाजूंनी मार्ग असून वरून बारवेचा आकार सुरेख दिसतो.११×११ चौरस मीटर मुख्य विहीर असून तिच्या ईशान्य बाजूला थोडा गोलाकार भाग दिसतो. एकूण८२ पायऱ्या असून प्रत्येक २० पायऱ्या संपल्यावर मोठी पायरी (Landing) थांबण्याची जागा आढळते. पायऱ्यांच्या अखेरीस दोन दगडी खांब असून त्यावर सुरेख कमान दिसते.विहिरीचे पूर्ण बांधकाम रेखीव अशा चिऱ्यांचे असून ते चुन्यातून घट्ट केले आहे. बांधकामामध्ये ठराविक अंतरावर खाचा ठेवल्या दिसतात. ही विहीर केंद्रीय पुरातत्व खात्याने संरक्षित स्मारक म्हणून ठरवली आहे. या विहिरीत खापरी पाटामार्फत कोयनेचे पाणी सोडत असावेत.कारण तिची खोली कोयनेच्या पात्रा इतकी असावी.अनेक मजल्यांच्या विहिरींचा उपयोग पाणीपुरवठा किंवा वस्तूंच्या साठ्यासाठी करत असावे असे सातारा जिल्हा गॅझेटिअर म्हणते.

Leave a comment