महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

भृंगी

By Discover Maharashtra Views: 2381 2 Min Read

भृंगी –

“शीष गंग अर्द्धंग पार्वती,
सदा विराजत कैलासी,
नंदी-भृंगी नृत्य करत हैं,
धरत ध्यान सुर सुख रासी”

भगवान शिवाच्या या आरतीत आपल्याला नंदी तर पटकन लक्षात येतो परंतू यात जो भृंगी असा उल्लेख आलेला आहे, याचा मात्र उलगडा होत नाही,तस्मात आजची कथा याच भृंगी ऋषिंबद्दल आहे.

‘भृंगी’ हे एक पौराणिक ऋषि होते, ते भगवान शिवाचे परम भक्त होते. परंतू जेवढी भक्ती ते शिवाची करत, त्याउलट माता पार्वती बद्दल त्यांना यत्किंचितही श्रद्धाभाव नव्हता. खरेतर, भगवान शिवाबद्दल त्यांची भक्ती अतुलनीय होती परंतू ते नेहमीच माता पार्वतीला शिवापासून वेगळे समजत. अर्थात च त्यांची महादेवाप्रती असलेली आसक्ती वा आस्था असेल. एकदा भृंगी ऋषी कैलास पर्वतावर महादेवास प्रदक्षिणा घालण्यास निघाले  होते,मात्र त्यांना माता पार्वतीची प्रदक्षिणा घालायची नव्हती.तत्क्षणी त्याची झालेली संभ्रमावस्था अवलोकून भगवान शिवास भृंगी चे भाव उमजले आणि असे ध्यानी आले की,तो अद्याप ही शिवपार्वतीस वेगळे समजण्याची चूक करत होता… सृष्टीच्या कणाकणांत शिव-शिवा एकरुप  आहेत. त्यांनी भृंगीस समजावले की – संपूर्ण ब्रह्मांडात, युगानुयुगे शिवपार्वती एकरूप आहेत.त्यांस विलग करण्याचे कृत्य यथायोग्य नव्हे तरी याकडे त्याने दुर्लक्ष केले आणि प्रदक्षिणेस सुरूवात केली. तत्क्षणी शिवपार्वती जवळ बसले असल्याने त्यास प्रदक्षिणेस मार्गच नव्हता म्हणुन त्याने सापाचे रुप धारण केले आणि प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिवाने अर्धनारीश्वर रूप धारण केले, तेव्हा ऋषी भृंगीने भुंग्याचे रूप घेऊन प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली.

हे पाहून,माता पार्वती (शक्ति) क्रोधीत झाल्या आणि त्यास शाप दिला की जे शरीर तुझ्या मातेपासून मिळाले आहे ते तुझी साथ सोडून देईल.कारण जो स्त्री चा अवमान करतो,तिच्या अस्तित्वास कमी लेखतो,अशा व्यक्तीत्वातील स्त्रीत्व नष्ट होणेच यथार्थ ठरेल कारण मातेकडून मांस रक्त मिळते तर पित्याकडून अस्थी पेश्या मिळतात,आणि हेच स्त्रीत्व जर नष्ट झाले तर साहजिकच अस्थिपंजर अवस्था होते.अखेरीस त्यास चूक उमजली व त्याने माता पार्वती ची माफी मागितली. ऋषींना ऊभे सुद्धा राहता येत नसल्याने,त्याची गलितगात्र अवस्था पाहून पार्वतीने त्यांना ऊभे राहण्यासाठी तिसरा पाय दिला ज्यामुळे उभे राहता येईल. अश्या प्रकारे या घटनेतून ‘अर्द्धनारीश्वर’ रूप प्रकटले. प्रत्येक पुरुषामध्ये स्त्रीअंश असतो, तद्वतच प्रत्येक स्त्रीमध्ये सुद्धा पुरुष अंश असतो अर्थातच स्त्री-पुरुष वा शिव व शक्ती एकमेकांशिवाय अपूर्णच आहेत.

Post – Shrimala K. G आणि Kiran Mengale.

Pic credit- A. Thomas

Leave a comment