औरंगजेबाने आपली पगडी उतरविली

औरंगजेबाने आपली पगडी उतरविली –

दोन वर्षांतील या अपयशाने औरंगजेबाची मानसिक अवस्था कशी झाली असेल याची कल्पना केलेली बरी. एवढा प्रचंड पैसा आणि सैन्यबळ पणाला लावून त्याच्या हाती केवळ नामुष्कीयुक्त पराभवच लागले होते. मराठ्यांचे शौर्य, धाडस, रणांगणावरील त्यांचे युद्धकौशल्य, आणि आपल्या राजासाठी प्राण पणाला लावण्याची त्यांची निष्ठा याने तो अचंबित झालेला होता. त्याचबरोबर आपल्या प्रचंड सैन्याच्या नामुष्कीयुक्त अपयशाने चिडचिडाही होत चाललेला होता. याबाबत ता. ३० जुलै १६८२ रोजी कारवारकरांनी सुरतेस लिहिलेले पत्र अत्यंत बोलके आहे.

यामध्ये कारवारकर लिहितात की, “मोगल (बादशाहा) राजा (संभाजी) विरुद्ध इतका चिडला आहे की, त्याने आपली पगडी उतरली आणि शपथ घेतली की, त्याला मारल्याखेरीज किंवा त्याला राज्यातून हांकून लावल्याखेरीज ती परत डोकीवर धारण करणार नाही. हे लवकर घडून यावे म्हणून आदिलशाहाला त्याने नऊ लाख रुपये खर्चास दिले आहेत.

“परंतु औरंगजेबाने आपल्या डोक्यावरची पगडी फेकल्यामुळे रणांगणावर काही फरक पडला असे मात्र झाले नाही. परंतु त्याच्या या अवस्थेमुळे मराठ्यांना मात्र जोर चढला.

अत्यंत चिडखोर बनलेला औरंगजेब –

या सततच्या अपयशामुळे दिल्लीस परत जाण्याचा सतत विचार करू लागला होता. याबाबत ता. १९ जून १६८३ मध्ये सुरतकरांनी फोर्ट सेंट जॉर्जला कळविलेल्या पत्रात याचे यथार्थ दर्शन घडते. या पत्रात सुरतकर म्हणतात, की, “मोगल (बादशाहा) अद्यापपावेतो तेथून हलला नाही. परंतु दाट वदंता आहे की, तो परत दिल्लीस जाण्याच्या विचारात असून संभाजीराजे यांच्या बरोबरील लढाईची सूत्रे आपल्या उमरावांच्या हाती सोपवणार आहे. तो अतिशय चिडखोर झाला आहे. त्याच्या मनाची अस्थिरता सारखी वाढत आहे.

त्यामुळे त्याचे उमराव फार नाराज झालेले आहेत. जर त्याचे आयुष्य (म्हातारपणामुळे) लवकर संपले नाही तर त्याला ते फार काळ जगू देणार नाहीत. त्यामुळे आम्हांस मात्र भीतिदायक वातावरणांत दिवस काढावे लागत आहेत. बहुतेक सर्वांची सदिच्छा अकबराकडेच आहे. आणि तो फार प्रयासाविना तख्तावर येऊन सर्वत्र स्थिरस्थावर करील असा लोकांचा ग्रह झालेला आहे. यावरून औरंगजेबाच्या मनःस्थितीचे यथार्थ चित्र आपल्यापुढे उभे राहाते.

औरंगजेबाच्या याच मनःस्थितीचे चित्र आपणांस फारशी बातमी पत्रातही आढळून येते. यामध्येही औरंगजेब लढाईची सर्व सूत्रे आपल्या अधिकाऱ्यांवर सोपवून दिल्लीला जावयाचा बेत करीत असल्याचे नमूद केलेले आहे. जेव्हा त्याने हा विचार आपल्या उमरावांना बोलून दाखविला तेव्हा त्याचे उमराव पार हादरून गेल्याचे दिसतात. औरंगजेबाचा उत्तरेकडे परतण्याचा विचार ऐकल्यावर ते म्हणतात

की, “तुम्ही स्वतः दक्षिणेत असूनही मराठ्यांविरुद्ध लढण्यात यश मिळत नाही तर तुम्ही गेल्यानंतर आमचे कसे होणार?”

यावरून औरंगजेबापेक्षा वयाने अत्यंत लहान, त्याच्या मानाने अनुभवही नगण्य, सैन्य व आर्थिक बळही

कमी असलेल्या संभाजी महाराजांनी ज्या पद्धतीने औरंगजेबाशी टक्कर दिलेली आहे, त्यातच त्यांचे श्रेष्ठत्व निश्चितपणे दिसून येत आहे.

अद्वितीय छत्रपती संभाजी महाराज.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here