अमृतेश्वर | Amruteshwar

Amruteshwar | अमृतेश्वर

अमृतेश्वर | Amruteshwar

निसर्ग भटक्यांसाठी सदैव आकर्षणाचा भाग म्हणजे नगर जिल्ह्य़ातील भंडारदरा. डोंगरदऱ्या, जंगल, घाटवाटा, गडकोट,जलाशय अशा विविधतेने हा भाग समृद्ध आहे. नगर जिल्ह्य़ातील अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण परिसर, रंधा धबधबा ही स्थळे आता पर्यटकांच्या चांगल्याच परिचयाची आहेत. पण या भागाचे खरे सौंदर्य धरणाच्या पलीकडील भागात दडले आहे. भंडारदरा पुण्याहून २०० तर मुंबईहून १८० कि.मी.वर असुन भंडारदरा ते रतनवाडी हे अंतर वीस किलोमीटर आहे. रतनगडाच्या पायथ्याशी व प्रवरेच्या किना-यावर रतनवाडीमधे अमृतेश्वराचे अप्रतिम कोरीव शिल्पकलेचा नमुना असलेले एक अद्भुत अमृतेश्वर मंदिर आपल्याला पहायला मिळते.

१०-११ व्या शतकामधे झांज राजांनी गोदावरी ते भीमा दरम्यानच्या प्रमुख बारा नद्यांच्या उगमाजवळ जी बारा मंदिरे बांधली त्यातील हे प्रवरेच्या उगमाजवळील अमृतेश्वर मंदिर. चालुक्य शैलीतील हे मंदिर म्हणजे अप्रतिम शिल्पकलेचा एक सुंदर नमुना आहे. नंदीमंडप, गाभारा, सभामंडप आणि शिखर अशी रचना असलेल्या या मंदिराच्या गर्भगृहास पुर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजुने प्रवेशद्वारे आहेत. मंदिर वास्तुशैलीतील हे विशेष याच भागातील सिद्धेश्वर व हरिश्चंद्रगड येथेही पाहण्यास मिळते. या आगळय़ा शैलीमुळे नंदीमंडपातून गाभारा आणि त्यानंतर सभामंडप असा आपला प्रवास होतो. ४५ ते ४८ फुट उंच चुना विरहित जोडकाम केलेले हे मंदिर पुर्ण दगडी असून त्याची लांबी ७० फुट व रुंदी ३६ फुट आहे. मंदिराचे एक मुख्य प्रवेशद्वार थेट मंदिराच्या गर्भगृहातच उघडते. गर्भगृहाच्या दारी कीर्तिमुख, शंख, कमळवेलींच्या पायघडय़ा घातल्या आहेत. मंदिराच्या गर्भगृहाला मागच्या बाजूला एक अर्धमंडप आहे. मंदिराच्या रचनेत खाली थरयुक्त चौरस तळखडा असून वर नक्षीकामाने सुशोभित असे चौरसाकृती खांब आहेत. या खांबांचा वरचा भाग अष्टकोनी असून त्यावर वर्तुळाकृती आहेत. अगदी वरती कीचकहस्त आहेत.

मंडपाचे छत घुमटाकार असून त्यावर ठरावीक अंतर सोडून नर्तक व वादकांच्या तिरप्या प्रतिमा आहेत. भुमिज पद्धतीचे हे मंदिर शिल्पकलेने नटलेले आहे. मंदिराच्या भिंतीवरचे कोरीव काम विविध मूर्ती, प्रवेशद्वारावरील मैथुन शिल्पे व देवदेवतांच्या कोरीव मूर्ती, शिवपूजेचा देखावा, नृत्य शिल्पे, नक्षीकाम अत्यंत सुंदर आहे. यातील समुद्रमंथनाचा देखावा तर अवश्य पाहावा असाच आहे. मंदिरात प्रकाश येण्यासाठी जागोजागी दगडी जाळय़ांची रचना केलेली आहे. मंदिराच्या मागच्या प्रवेशद्वारातून आत जाताच वर छताकडे पाहिले असता तिथे उलटे वीरगळ रचलेले आहेत. मंदीराच्या बाहेरील वीरगळांची येथल्या पावसामुळे खूपच हानी झालेली आहे पण आतले वीरगळ अगदी उत्तम स्थितीत आहेत. अर्थात हे पाहण्याकरीता झोपून वर विजेरीचा झोत मारावा लागतो नाहीतर अंधारामुळे ते दिसत नाहीत. मंदिराचे शिखर भूमिज प्रकारचे असून शिखरावर चारही बाजूंनी एक एक अशा चार वेली आहेत त्यावर पुन्हा शिखरांच्या छोटय़ा प्रतिकृतींची रचना केलेली आहे. मंदिराच्या आवारात एक गधेगाळ असुन त्यावरील शिलालेख पूर्णपणे झिजल्याने वाचता येत नाही मात्र हा शिलालेख अमृतेश्वर मंदिराला दिलेल्या दानाबद्दलचा असावा व हे दान मान्य न करणाऱ्यास शापवाणी कोरलेली असावी.

मंदिराच्या जवळ चौरस बांधणीची व पायऱ्यांची पुष्करणी आहे. अमृतेश्वराची ही पुष्करणी तब्बल वीस फूट लांब-रुंद जमिनीलगत असुन कोरीव, आखीव-रेखीव अशी तिची रचना आहे. एका बाजूने आत उतरण्यासाठी पायऱ्या असुन आत फिरण्यासाठी धक्के ठेवलेले आहेत. सभोवतीच्या भिंतीत नक्षीदार १२ देवळ्या असून त्यात गदाधारी, चक्रधारी व शेषधारी अशा भगवान विष्णूच्या मूर्ती आहेत. त्यांच्या डोईवर पुन्हा छोटय़ा-छोटय़ा कोरीव शिखरांची रचना केलेली आहे. या देवळ्यात गणेशाची एक मूर्ती सोडल्यास सर्व ठिकाणी विष्णूचे अवतार दाखवले आहेत. ही जलवास्तू जेवढी देखणी, तितक्याच नितळ पाण्याचीही तिला साथ मिळालेली आहे. स्थानिक लोक या पुष्करणीला विष्णूतीर्थ म्हणतात आणि समुद्रमंथनाच्या चौदा रत्नातून हे मंदिर आणि तीर्थ तयार झाल्याची कथा ऐकवतात. मंदिर व पुष्करणी डोळसपणे पहायला हाताशी कमीतकमी दोन तासाचा अवधी असायला हवा. येथून साम्रद साधारण ७ कि.मी. असुन तेथुन सांदण दरीस अथवा रतनगडास जाता येते अथवा आपली भ्रमंतीची सांगता करता येवू शकते.

@सुरेश निंबाळकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here