महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

Shitole Wada | सरदार शितोळे वाडा, पुणे

By Discover Maharashtra Views: 1824 3 Min Read

Sardar Shitole Wada | सरदार शितोळे वाडा, पुणे –

पुण्याला वाड्यांचे शहर सुद्धा म्हणतात. इथे अनेक सरदारांचे भव्य वाडे आपल्याला बघायला मिळतात. परंतु त्यातील काही काळाच्या ओघात लुप्त झाले, तर काही अजून थोडीफार ओळख टिकुन आहेत. त्यातीलच एक आहे  शितोळे वाडा (Shitole Wada). कसबा गणपतीकडुन तांबट आळीकडे जाताना उजव्या हाताला हा वाडा दिसतो. शिवाजी महाराजांनी पुणे वसवण्यापुर्वीपासूनच शितोळे देशमुख यांचा टोलेजंग वाडा पुण्यात होता. नंतर पेशवाईच्या काळात पुण्याची देशमुखी ही शितोळ्यांकडेच होती.

हे शितोळे सिसोदिया रजपुतांचे वंशज असून त्यांचे काही पूर्वज दख्खनेत आल्यावर शितोळे म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांना मिळालेल्या सनदा आणि इतर कागदपत्रांवरून या घराण्याने १२०० वर्षापेक्षाही जास्त काळ देशमुखी उपभोगली असे कळते. नंतरच्या काळात या घराण्याचे तीन शाखांमध्ये विभाजन झाले. सातभाई- शितोळे, नाईक – शितोळे आणि नरसिंगराव – शितोळे.

नरसिंगराव शितोळे घराण्यातील मालोजीराव यांनी पेशवाईच्या काळात लढाईमध्ये उत्तम कामगिरी बजावली. त्यावर खुश होऊन त्यांना दख्खनमध्ये अनेक वतने मिळाली. याच घराण्यातील सिद्धोजिराव उर्फ खंडोजीराव यांनीही मर्दुमकी गाजवली. या सगळ्यात महादजी शिंदे आणि त्यांच्यात मैत्रीचे नाते निर्माण झाले. महादजींनी उत्तरेत गाजवलेल्या शौर्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडे सिध्दोजीरावांच्या सेवेची मागणी केली. त्यांना आपल्या पदरी ठेवण्याची विनंती केली. अशा प्रकारे दोन्ही कुटुंबाचे ग्वाल्हेर मध्ये वास्तव्य झाले.

या घराण्याच्या कुटुंबप्रमुखाला नरसिंगराव हा किताब देण्याची प्रथा आहे. लाडोजीराव यांचे पुत्र सिध्दोजीरावाने सत्ताग्रहण केल्यावर ते दिल्लीच्या बादशहाच्या भेटीसाठी गेले असता बादशहाने “उमादत्त उल मुल्क राज राजेंद्र सिद्धोजीराव सितोळे राजा देशमुख बहादुर रुस्तुम जंग’ हा किताब आणि ६००० पायदळ व ५०००  घोडदळ दिले. या घराण्यातील महादजी शितोळे यांनी रक्षसभुवनच्या लढाईत निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर याला मारले. या अतुल पराक्रमाने खुश होऊन श्रीमंत पेशवे यांनी शितोळे यांना मांजरी गाव व सरदारकी बहाल केली.

शितोळ्यांचे कुलदैवत नृसिंह. पनिपतला लढाईवर जाण्याआधी शितोळ्यांच्या वंशातील एका पुरुषाला “ तबेल्यातल्या घोड्यांच्या टापाखाली मी आहे” असा दृष्टांत झाला. वाड्यातून आत गेल्यावर समोरच सुंदर अस मंदिर आहे. ती पंचधातूची नृसिंहाची मूर्ती होती तिला हिऱ्यामाणकांचे दागिने होते दर नृसिंह जयंतीला उत्सव केला जात असे. कसबा गणपतीच्या बाजूने वाड्यातील पूर्वीचा काही भाग शिल्लक आहे.  मंदिराच्या शेजारी सतीचे वृंदावन आहे. अशा या वास्तूत संत तुकाराम महाराजांनी कीर्तन केले होतें, तर शाहीर होनाजी बाळाने आपली कवनेही गेली होती.

पत्ता :
https://goo.gl/maps/6UspTmEKQWDBG4588

आठवणी इतिहासाच्या

Leave a comment