महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

स्वराज्य संकल्पक महाराज शहाजीराजांची दिनचर्या

By Discover Maharashtra Views: 3656 5 Min Read

स्वराज्य संकल्पक महाराज शहाजीराजांची दिनचर्या –

स्वराज्य संकल्पक महाराज शहाजीराजांची दिनचर्या कशी होती याबाबत समकालीन जयराम पिंडे यांनी त्यांच्या राधामाधवविलासचंपू या ग्रंथात आपल्या शब्दचित्राने रंगविलेली आहे . यावरून आपणास शहाजी महाराज यांना स्वत:च्या धर्माविषयी व धार्मिक रूढी , देवदेवता यांविषयी किती अभिमानयुक्त आदर होता त्याचा प्रत्यय येतो. वेद , संस्कृत भाषा , होम यज्ञ , शुभशकून यांच्याविषयीचा आदर त्यांच्या मनात होता . शहाजी महाराजांचे ऐश्वर्य व राजेशाही थाट हा एखाद्या सार्वभौम राजासारखा असे. राजसभेत अनेक नामवंत कवी , विद्वान ब्राम्हण , संस्थानिक , सरदार , परराज्यांचे वकील सल्लामसलतीसाठी हजर असत.

जगदीश वीरंचकू पुछत है कहो शिष्टी रची रखे कोण कहां /
कर जेरि कही जयराम विरंच्ये तिरीलोक जहां के तहां //
ससी वो रवि पूरब पश्चिम लों तुम सोय रहो सिरसिंधू महा /
अरु उत्तर दछन रछन को इत साहजु है उत साहिजहां //

भावार्थ :- परमेश्वर ब्रम्हदेवाला विचारतात कि तु हि सृष्टी रचीलीस तिचे रक्षण करण्यासाठी कोणास ठेवले आहेस ते तु मला सांग. तेंव्हा ब्रम्हदेव सांगतात कि पूर्वेचा रक्षक रवि ( सूर्य ) व पश्चिमेचा रक्षक चंद्र केला आहे . तसेच उत्तरेचा लोकपाल शहाजहान पातशहा केला आहे व दक्षिणेचा रक्षक शाहजीमहाराज केले आहेत .

शहाजी महाराजांची दिनचर्या पुढीलप्रमाणे :-

पहाटेस शेजघराजवळ बाळसंतोष , कुडबुडे जोशी व शाहीरलोक भूपाळ्या वैगरेंचे मधुरलाप काढून राजाला सुखशय्येवरून उठवीत . इतक्यात विश्वनाथभट्ट उच्चस्वराने प्रात:स्मरण संस्कृत भाषेत करीत. कित्येक ब्राम्हण पुण्याहवाचनाचे म्हणजे राजाला सुखाचा दिवस जावो अश्या अर्थाचे मंत्र म्हणत. कित्येक विप्र ॐकारपूर्वक वेदपठन करीत. कित्येक स्वस्तिसाम्राज्यादी मंत्रांनी आशीर्वाद देत व कित्येक अग्निहोत्री वषटकारापर्णात गुंतलेले असत . मंत्रपठनाच्या भूपाळ्यांच्या व प्रात:स्मरणाच्या या धांदलीत राजा शेजे वरून उठून अंगणात येऊन आकाशाकडे पाहून अरुंधती , शची , देवसेना व आकाशगंगा इत्यादी तारांगणावर नजर फेकून आणि शिव , विष्णु , स्कंद उर्फ खंडोबा , ब्रम्हदेव ,लोकपाल , इंद्रादी देव , होमशाळेतील अग्नी इत्यादींचे दर्शन घेऊन दिशावलोकन करीत . ह्याच सुमारास जंगम शंख फुंकीत , गुरव शिंग वाजवीत व घडशी चौघडा सुरु करीत . ह्या मंगलध्वनींच्या निनादात तुफान ऐरावत , सवत्स गाय , पुत्रिणी ब्राम्हणी , वर्धमान मानुष म्हणजे विदुषक , ठेंगू ब्राम्हण व पाण्यातून नुकताच बाहेर निघालेला वराह हे शुभचिन्हक प्राणी राजापुढून जात.

नंतर वाड्याच्या समोरील पटांगणात हजार पाचशे घोडेस्वार किंवा पाईक कवायत करीत . त्यांची परेड दिल्लीदरवाजाच्याबाहेर येऊन पाहून रथ, पालख्या , शिबिका वैगरे वाहनांचे अवलोकन राजा करी . इतक्यात दरवेशी एखादा दुसरा सिंहाचा बच्चा व थट्टी कामगार एखादा माजलेला पोळ राजापुढे नाचत बागडत आणीत . नंतर हंस , चाप , मत्स्य यांचे शुभशकून घेत व दरवाजावरील तोरणाकडे पाहत वाड्यापाठी मागील अश्वत्थ, औदुंबर वैगरे शुभवृश व पारीजातकादी पुष्पवृक्ष यांच्या छायेखालुन राजा जाई . शेवटी दक्षिणावर्त शंखातल्या तीर्थांचा नेत्रांना स्पर्श करून व वेळूच्या लंबायमान दांड्याच्या अग्रावर लटकत व फडफडत असलेल्या जरीपटक्याकडे सकौतुक दृष्टीक्षेप चढवून राजा नाडीपरीक्षणार्थ आपला हात राजवैद्यांपुढे करी. सेवेचे एक ब्राम्हण एका हातात तेलाने भरलेली रुप्याची परात व एका हातात तुपाने भरलेली सोन्याची परात राजापुढे आणी. त्यात मुखाचे प्रतिबिंब पाहून व अष्टोदश मंगलांचा शुभशकून घेऊन राजा स्नानोपहारादि सेवन केल्यावर सभामंडपात प्रवेश करी. सभामंडपाला उर्फ दरबाराला ‘नवगजी’ असे नाव असे.

त्या नवगर्जीत राजे, उपराजे, संस्थानिक , परराष्टीय वकील व सरदार आधीच येऊन हजर असत. पंडित , कवी , शास्त्री , वैदिक इत्यादी सरस्वती पुत्रांचा हि समुदाय राजदर्शनाची उत्कठेने वाट पाहत असे. नंतर भालदारांच्या ललकाऱ्यात व जनसंमर्दामधून वाट काढीत येणाऱ्या चोपदारांच्या ठाणकाऱ्यात महाराज हातातील तरवारीचे अग्र जमिनीला टेकीत टेकीत ( कारण शहाजी महाराजांचे वय ह्या काळी साठीच्या पुढे गेले होते ) सभास्थानांत गंभीर रुबाबाने प्रवेश करून सिंहासनरूढ होत. हा प्रात:कालीन कार्यक्रम झाला. भोजनोत्तर दोन प्रहरानंतर हि कधीकधी स्वारी शिकार नसल्यास पंडित व कारभारी यांच्या सभेत बसून सायंकाळपावेतो राजकारण , ब्रम्ह्चर्या , काव्य – विनोद , दानधर्म , पंगुपरामर्श न्यायमनसुबी , जेठीमल्लयुद्धे इत्यादी लघु किवा जड व्यवहारात महाराज गुंतलेले असत. सायंकर्म आटोपल्यावर उपहारोत्तर खलबतखान्यात शेलक्या मुत्सद्यांच्या समवेत गुप्त कारवाई चाले.

शौर्याने पृथापुत्र अर्जुनासारखे , दातृत्वाने विक्रमादित्यासारखे व ज्ञातृत्वाने भोजराजासारखे शहाजीराजांचे दर्शन आपणास घडते. अशी हि शहाजी महाराजांची, शहाजीराजांची दिनचर्या जयराम पिंडे यांनी त्यांच्या राधामाधवविलासचंपू या ग्रंथात आपल्या शब्दचित्राने रंगविलेली आहे .

संदर्भ :- जयराम पिंडयेकृत राधामाधवविलासचंपू :- वि.का.राजवाडे
छायाचित्र :- साभार विकिपीडिया.

नागेश सावंत

Leave a comment