महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. आपली छोटीशी मदत आम्हाला मोलाची ठरेल. 👉Donation/देणगी साठी क्लिक करा.👈 Website Views: 91,46,099

फरिश्ता ते फिरस्ता – परकियांच्या नगर विषयीच्या नोंदी

Views: 6
6 Min Read

फरिश्ता ते फिरस्ता – परकियांच्या नगर विषयीच्या नोंदी

आताचं अहिल्यानगर म्हणजे पूर्वीच अहमदनगर २८ मे हा या शहराचा स्थापना दिवस. स्थानिक लोक या शहराला फक्त नगर म्हणूनच संबोधतात. इथल्या बोलीभाषेलाही नगरी म्हटलं जातं . या शहराविषयी आणि इथल्या लोक जीवनाविषयी परकियांनी सुद्धा भरभरून लिहिल तर काहींनी चित्रातून आपल्या भावना प्रकट केल्या.परकियांच्या नगर विषयीच्या नोंदी.

फार भटकंती करणाऱ्या व्यक्तीला आजही फिरीस्ता म्हणतात. हा फिरीस्ता शब्द ज्याच्या नावावरून आला तो नगरचा इतिहास लिहिणारा पहिला इतिहासकार म्हणजे फरिश्ता. हा लहान होता तेव्हा मिरान हुसेन निजामशहाला फारसी शिकवण्यासाठी आलेल्या त्याच्या वडिलांबरोबर नगरला आला. इसवी सन १५८७ मध्ये तो मुर्तझा निजामशहाच्या अंगरक्षकांचा प्रमुख बनला. पुढे मिरान हुसेन निजाम शहाच्या बंडाळीत त्याला विजापूरला पलायन करावे लागले. त्याने तारीख इ फरिश्ता नावाने दख्खनचा इतिहास लिहिला.

इथल्या निजामशहाचे गोव्यातील पोर्तुगीजांशी चांगले संबंध होते. इसवी सन १५८३ ते १५८९ दरम्यान पोर्तुगीजांच्या राज्याची माहिती मिळवण्यासाठी आलेला डच प्रवासी आणि गुप्तहेर जॉन व्हॅन ह्युजेन लिंसशोटेन मूर्तझा निजामशहाच्या काळात या परिसरात येऊन गेला त्याने इथल्या फळ झाडांविषयी लिहिलं. त्यात त्याने आंबा फळाविषयी लिहिताना अहमदनगर, चाकण आणि चांदवड या बालाघाटाच्या रांगेतील आंबे चवीला उत्तम असल्याचं म्हटलंय.

बाँबे प्रसिडेंसी मध्ये प्रवासी म्हणून आलेला लुईस रुझेलेट या शहराविषयी लिहितो- किल्ल्याच्या भिंती आणि बुरुजांनी वेढलेले हे एक व्यावसायिक शहर आहे. ब्रिटीश छावणीतील बागा आणि झाडांमुळे हे शहर वाळवंटातील हिरवळी प्रमाणे भासते. इथली घरे अर्धी हिंदू आणि अर्धी पठाण शैलीतील आहेत. विजापूरची अजस्त्र तोफ इथंच ओतण्यात आली होती. असं म्हणतात की या तोफेने तीस किलोमीटर पर्यंत गोळा डागला होता.

मिशनरी हेराल्ड नावाच्या अमेरिकेतून प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकात नगर शहरातील नगर कॉलेज नावाने प्रसिद्ध असणाऱ्या महाविद्यालया विषयीची नोंद आढळते. यातील रेखा चित्राचे वर्णन करताना म्हटलंय – डाव्या बाजूला दाखवलेली जुनी इमारत कोलंबसने अमेरिका शोधण्यापूर्वी बांधली गेली होती आणि अनेक वर्षे अहमदनगर स्वतंत्र राज्य असताना ती निजामशहाचे निवासस्थान होते.वरचा मजला पन्नास वर्षे मिशन हाऊस म्हणून वापरला गेला. खालच्या मजल्यावर सहा खोल्या आहेत, पण त्यापैकी तीन मोठ्या वर्गांसाठी खूपच लहान आहेत. १८५५ मध्ये जुन्या इमारतीप्रमाणे दगडातून आणि सभागृहासह नवीन इमारत बांधली गेली. नवीन इमारतीत मेसर्स. ए.एच. अँड्र्यूज अँड कंपनीच्या फोल्डिंग-डेस्क आणि सेटी आहेत. सभागृहात सुमारे चारशे लोक बसू शकतात. जुन्या इमारतीच्या मागे, त्याच्याशी समकोनात, १८६६ मध्ये बांधलेली इमारत आहे ज्यात दोन मोठे वर्ग आहेत. इमारतीची एकूण लांबी १६६ फूट आहे; रुंदी ५४ फूट. मागचा भाग २८ फूट बाय ५० फूट आहे.

लेफ्ट. कर्नल नेवेल नावाचा एक इंग्रज अधिकारी भारतभर फिरला. त्याच्या पुण्या पासून नगर पर्यंत मोटार प्रवासाचा वृत्तान्त त्याने ‘ टोपी अँड टर्बन’ नावाच्या पुस्तकात लिहून ठेवलाय. त्यात त्याने या रस्त्याला व्हाया सॅक्राची ( Via sacra) म्हणजे पवित्र रस्त्याची उपमा दिली. मध्ये आलेल्या गावांची नोंदही त्याने करून ठेवलीय. सुप्याच्या डाक बंगल्यावर थांबला असता तिथल्या आचाऱ्याने ‘च्या ‘साठी पाणी गरम करून दिल्याची गमतीशीर नोंद तो करतो.

‘ रिलीजन अँड फोकलोर ऑफ नॉर्थर्न इंडिया ‘ नावाच्या पुस्तकात विल्यम क्रूक ने इथल्या बैल पोळ्या विषयी लिहिलंय. यात साप चावल्यास लोक त्या व्यक्तीला भैरोबाच्या देवळात घेऊन जातात अशीही एक नोंद आढळते. यात पाऊस पडावा म्हणून एकमेकांना दगड मारून खेळल्या जाणाऱ्या गोफण गुंड्याच्या लढाईचेही वर्णन आढळते

कॅप्टन सेसिल कावली याने ‘टेल्स ऑफ अहमदनगर’ नावाने इथला इतिहास लिहिला. यात तो या शहराचा इतिहास दोन हजार वर्षे मागे नेतो. यात तो म्हणतो नगरच्या पोस्ट ऑफिस बाहेरचा उतरकेडे तोंड करून असणारा फलक पैठण चा रस्ता दाखवतो नगर जवळचे भिंगार हे शहर पैठण इतकेच प्राचीन असल्याची नोंद यात आढळते. दोन्ही शहरे व्यापारी मार्गावर असल्याचा दाखला तो देतो. पैठण पासून भिंगार हे दोन दिवसांच्या अंतरावर आहे.अहमदनगर शहर याच भिंगार शहराच्या परिसरात वसविले गेले. यातील एक वेगळीच नोंद म्हणजे देवगिरीच्या यादवांचा सेनापती हेमाद्री हा मूळचा इराणी होता असं तो लिहितो.

धर्म प्रसारासाठी आलेल्या ख्रिस्ती मिशनऱ्यांनी इथल्या लोक जीवनाविषयी बरंच लिहून ठेवलं. इथल्या लोकांना ते नेटिव म्हणत. त्यांच्या ‘ज्ञानोदय ‘ नावाच्या मराठी वृत्त पत्रात १६ मार्च १८६३ रोजी या शहराविषयी एक बातमी प्रसिद्ध झाली होती ती अशी – अहमदनगर हे जिल्ह्याचे गाव आहे. त्याच्या वैभवाच्या खुणा या गावामध्ये दिसतात, येथील भुईकोट किल्ल्याभोवती खंदक आहे. त्यात हरिणे हिंडत असतात. पश्चिमेस सीना नदी आहे. पण ती पावसाळी नदी असल्यामुळे एरव्ही जोडेही भिजवू शकत नाही. मग पक्ष्याची चोच कुठून भिजणार ! शहरास ९ गावकुसूचे दरवाजे आहेत. त्यांस वेस असे नांव आहे, रस्ते स्वच्छ व सुंदर आहेत. कारण म्युनिसीपालिटी फार काळजी घेते. निजामशाहीत बसवलेल्या नळांनी पाणी येते. गंजबाजारात भाज्या मिळतात, तर कापडबाजारात सुशोभित अशी कापड-दुकाने आहेत. पूर्वेस लष्कराची छावणी असून युरोपियन भजनालय आहे. उडकाकच्या बागेजवळ मंगळवारी बाजार भरतो. सर्जेपुरा वेशीजवळ मोठी धर्मशाळा आहे. गावाजवळ ‘ फऱ्याबाग’ म्हणून तीन मजली इमारत आहे. चांदबिवीच्या महालात सलाबतजंगाची कबर आहे. सरकारी इंग्लिश शाळा असून तीन मराठी शाळा आहेत, व पोलिसांकरिता एक शाळा आहे. एक पुस्तकालय आहे. परंतु आश्रय कमी असल्यामुळे त्याची स्थिती भिक्षुकी आहे, एक छापखाना असून तेथे वृत्तवेभव पत्र निघते.

याच ज्ञानोदयात’ फिरस्ता ‘ या टोपण नावाने एक युरोपियन साहेब स्थानिक सावकारांविषयी लिहित असे.

© सतीश भि. सोनवणे

Leave a Comment