महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

पाताळेश्वर लेणी

By Discover Maharashtra Views: 3498 5 Min Read

पाताळेश्वर लेणी –

पाताळेश्वर लेणी हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातल्या शिवाजीनगर भागात वसलेले एक शिवालय आहे. हे शिवालय राष्ट्रकूट राजवटीच्या काळात इ.स.च्या ८ व्या शतकाच्या सुमारास लेण्याच्या स्वरूपात खोदून घडवले आहे.  पुणे शहराच्या इतिहासात बघायला गेलं तर इथे अनेक राजवटी नांदल्या.

समुद्र मार्गाने आलेल्या वस्तूंचे महाराष्ट्रभर दळणवळण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्राचीन कल्याण-नाणेघाट-जुन्नर-मंचर-चाकण मार्गात पुणे जुन नाव पुन्नक-पुणवली किंवा पुण्यविषय/पुनकविषय राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला याच्या कारकीर्दीत दिलेल्या ताम्रपटात ही नावे आढळतात हे गाव येत असे. पण तुम्हाला माहीत आहे का, ह्याच सर्वगुणसंपन्न पुण्यात एक प्राचीन  ‘लेणं’ सुद्धा आहे! आणि ते ही अगदी भरगच्च गर्दीच्या ठिकाणी.

स्वतःच अस्तित्व टिकवण्याची केविलवाणी धडपड करणारे आठव्या शतकातील राष्ट्रकूट कालीन ‘शिवलेण’. इसवीसनाच्या आठव्या शतकात राष्ट्रकूट राजवटीचा अंमल होता. साधारण त्याच कालावधीमध्ये भांबुर्डा गावठाणाजवळ सध्याचे शिवाजीनगर, पूर्वी या भागाला भांबवडे म्हणले जायचे, त्याचे नामांतर इंग्रजांनी भांबुर्डे केले आणि पुढे आचार्य अत्रे यांच्या प्रयत्नांनी शिवाजीनगर असे नामकरण झाले. एका शिवमंदिराचे बांधकाम ,कोरीवकाम झाले. हे मंदिर जमिनीपासून साधारणपणे १-२ मीटर खाली असल्याने कदाचित याला पाताळेश्वर असे नाव दिले असावे!

प्रख्यात लेणीअभ्यासक ‘जेम्स फर्गुसन’ याने या लेण्यांबद्दल काढलेल्या अभ्यासपूर्ण टिपणांमध्ये ही लेणी आठव्या शतकात राष्ट्रकूट राजाच्या कालावधी मध्ये तयार झाली असावी असा निष्कर्ष नमूद केला आहे. मंदिराची घडण ब्राम्हणी शैलीची असून, एका अखंड बेसॉल्ट खडकात कोरून मंदिराला आकार दिला आहे. मंदिराच्या प्रांगणात एक भला मोठा दगडी नंदी मंडप आहे, ज्यात नंदीची मूर्ती आहे. मंदिरात भले मोठे चौरस दगडी खांब असून ते एकाच दगडात कोरून घडवलेले आहेत.

मंदिराच्या मध्यभागी तीन गाभारे असून मध्ये शिवलिंग व डावीकडे गणेशाची व उजवीकडे पार्वतीची मूर्ती आहे. तसेच गाभार्याच्या प्रदक्षिणा मार्गात, बहुतेक नंतरच बसवले राम-लक्ष्मण-सीतेची मूर्ती व समोर मारुती ची मूर्ती आहे. प्रदक्षिणा मार्ग देखील प्रशस्त आहे. मंदिराची भव्यता मनाला भारावून टाकणारी आहे. भर उन्हात देखील मंदिरातील गारवा मन प्रसन्न करतो. मंदिरात पृष्ठभागावर बरीच लहान-सहान नक्षी आपल्याला पाहायला मिळतात.

पावलांचे आकार, हाताचे आकार, मानव आकृती आहेत. त्याच बरोबर भिंतींवर अनेक आकृत्या देखील आहेत. दुर्दैवाने, मंदिरातील अनेक शिल्प अपूर्ण किंवा भग्नावस्थेत आहेत. त्यामुळे शिल्प नक्की आहे तरी काय हे ओळखता येत नाही. मंदिराच्या प्रवेश द्वारावर देवनागरी बहुतेक संस्कृतातील लेख आहे, जो जीर्ण झाल्यामुळे अस्पष्ठ आहे. मंदिरा विषयी काही धार्मिक लोक आख्यायिका सांगतात,

‘ही “पाताळेश्वर लेणी” पांडवकालीन आहेत. पांडव द्यूत जुगारात हरल्यानंतर १२ वर्षे वनवासी होते. तेव्हा काही दिवस ते पुण्यातही होते… द्रौपदीने पूजा केलेले शिवलिंग म्हणजेच “पाताळेश्वर”!’ ह्या लेण्यांचा थेट संबंध वेरुळातील कैलास लेण्यांशी आहे. पाताळेश्वर हे लेणे जमिनीव्या खाली जमीन खोदून बांधण्यात आले आहे. पाताळेश्वर आणि वेरूळमधील राष्ट्रकूट कालखंडातील लेणी यांत साम्य आढळते. त्या एकाच परंपरेतील ही लेणी असावीत. पाताळश्वर लेण्याला मोठे परांगण आहे. प्रांगणाच्या मध्यभागी वर्तुळाकार नंदीमंडप आहे. या नंदीमंडपाचे छत प्रचंड मोठे, जाड व वर्तुळाकार कातळाचे आहे. हा कातळ स्तंभांनी पेलला आहे. त्याच्याआत आणखी एक वर्तुळ आहे, त्यावर नंतरच्या काळात ठेवण्यात आलेला एक नंदी आहे.

लेण्यात प्रवेश केल्यावर चौकोनी स्तंभांच्या रांगा आहेत. समोर तीन गर्भगृहे आहेत. मधल्या गर्भगृहात शिवलिंग आहे. त्याच्या द्‌वारशाखांवर, म्हणजे गर्भगृहाच्या दरवाज्याजवळ नक्षी कोरली आहे. येथे प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहामागील भाग हा पुढील भागापेक्षा लहान आहे. मागच्या भिंतीला लागून काही भागांत कट्ट्याचे काम पूर्ण झालेले आढळते. एका भागातील काम अर्धवट आहे.तेव्हा लेणी खशी खोदत असतील, पुढे कसे जात असतील ते लक्षात येते.

गर्भगृहाव्या डाव्या आणि उजव्या हाताच्या भिंतींवर जी शिल्पे दिसतात ती पूर्णपणे खराब झाली आहेत, किंवा त्यांचे काम अपुरे राहिले आहे. त्या शिल्पांतील एक लिंगोद्भव शिवाचे आणि एक त्रिपुरासुर वधाचे आहे. लेण्याच्या बाहेरील भिंतीवर एक झिजल्यामुळे न वाचता येणारा शिलालेख आहे. पेशवे काळात या मंदिराची नोंद आहे आणि मंदिराला दषिणा दिल्याचे उल्लेख आहेत.

भारत सरकारने पाताळेश्वर लेण्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ च्या ब्रिटिश सूचनापत्राला अनुसरून महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. याच्या जवळून जंगली महाराज रस्ता वाहतो. हे पाताळेश्वरचे मंदिर एकाच मोठ्या खडकात खोदकाम करून निर्माण केले आहे. ह्या मंदिरात राम, सीता, लक्ष्मण, लक्ष्मी आणि गणेश ह्या दैवतांच्याही मूर्ती आहेत. त्या अर्थातच नंतर कुणीतरी ठेवल्या आहेत.

Credit – Wikipedia & Facebook

Leave a comment