महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ पासून Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ३५ हुन अधिक विषयांवर ३०००+ लेख आहेत. वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Website Views: 94,63,661

पानिपतच्या सर्व लढाई

Views: 9059
4 Min Read

पानिपतच्या सर्व लढाई…

पानिपत १५२६ आणि १५५६ (पानिपतच्या सर्व लढाई)
अहमदशाह अब्दाली आणि मराठे यांच्यात झालेले तिसरे पानिपत युद्ध संदर्भासहित वर्णन करायला जावं तर खूप सविस्तर उत्तर होईल म्हणून मी इकडे ते युद्ध वगळून पहिल्या दोन्ही पानिपत युद्धांबद्दल लिहिणार आहे.
पानिपत – १ = २१ एप्रिल १५२६
पानिपतचे पाहिले युद्ध बाबर आणि इब्राहिम खान लोदी यांच्यात झाले. बाबरने १५१९ मध्ये हिंदुस्तानवर पहिली स्वारी केली. पुढे पाच वर्षांनी १५२४ मध्ये दौलतखानने(पंजाबचा सुभेदार) दिल्ली च्या सुल्तानाविरुद्ध लढण्यासाठी बाबरला मदतीचा हात मागितला. हिंदुस्थान काबीज करण्याची बाबरची महत्वकांक्षा ही जुनीच होती.परंतु पुढे दौलतखान बाबरला सोडून गेला आणि बाबरला सुद्धा काबूलला परत जायचे होते म्हणून अल्लाउद्दीन लोदीस(इब्राहिमखान लोदी चा भाऊ) बंदोबस्तास ठेवून बाबर पुन्हा काबूलास गेला.
हा अल्लाउद्दीन लोदी पुढे बेसावध राहिल्याने दिल्लीच्या जवळ इब्राहिम लोदी ने त्याचा पराभव केला. हे वृत्त बाबरला समजताच तो अल्लाउद्दीन च्या मदतीला पुन्हा हिंदुस्तानात आला. ही बाबरची शेवटची हिंदुस्तानवरील स्वारी होती. या स्वारीत दौलतखान बाबर ला शरण आला.
यानंतर बाबरने दिल्लीवर स्वारी केली. बाबरला प्रतिकार करण्यासाठी इब्राहिम खान लोदी एक लक्ष सैन्यासाहित त्यावर चालून गेला. बाबराजवळ २००००-२५००० फौज होती. त्याचा १८ वर्षाचा मुलगा हुमायून हा देखील यावेळी हजर होता.
दोन्ही सैन्य पानिपत ठिकाणी रणांगणावर समोरामोर उभे राहिले.बाबर कडे ७०० तोफा होत्या आणि त्यामागे आपली फौज उभी केली. याउलट इब्राहिम लोदी कडे हत्ती होते आणि बाबरच्या सैन्याने यापूर्वी युद्धात हत्तीचा वापर केलेला नव्हता.
२१ एप्रिल १५२६ लढाई चा पहिला दिवस होता. सुमारे दोन प्रहर तुंबळ युद्ध चालले. हळूहळू दोन्ही बाजूने पुढे सरकत बाबरच्या सैन्याने लोदीचा सैन्याला घेरले. आणि पुढे विजय मिळवला आणि पानिपतचे युद्ध जिंकले. याच वेळी बाबरने एक तुकडी दिल्लीस आणि हुमायून यास आग्रा काबीज करण्यासाठी पाठवले आणि दोन्ही शहरे काबीज झाली.
main qimg 7a904478b0df6559f9a24ac25329f3e1
बाबर.
पानिपत – २ = ५ नोव्हेंबर १५५६
पानिपतचे दुसरे युद्ध हेमू आणि अकबर यांच्यात झाले. लोदीचा पराभव करून बाबरने दिल्लीत सत्ता स्थापन केली. मात्र बाबर पुढे चारच वर्षे जगला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा हुमायुन हा सत्तेवर आला. सूरी घराण्यातील अफगाणांनी तसेच एतद्देशीय भार्गवकुलीन हेमू या सेनानीनेही त्याला पराभूत केले.
पुढे हुमायुन वारल्यानंतरही त्याचा अल्पवयीन मुलगा अकबर याच्या सैन्याविरूद्धही हेमूने लढाया जिंकल्या. हुमायुन व अकबराविरूद्ध मिळुन हेमूने एकुण २२ लढाया जिंकल्या. हेमूने दिल्ली काबीज केली व स्वतःला राज्याभिषेक करवून ‘हेमचंद्र विक्रमादित्य’ असे नाव धारण केले.
यावेळी अकबर अल्पवयीन असल्याने त्याचा सगळा कारभार हुमायुनने नेमलेला बहरामखान हाच करत होता. हेमू वर हल्ला करण्यासाठी मुघल सैन्य पंजाबकडुन दिल्लीकडे निघाले. हेमूही त्याचे सैन्य घेऊन निघाला व शेवटी पानिपतच्या रणमैदानात दोन्ही सैन्य समोर ठाकले. हेमूचा तोफखाना जरा पुढे गेला होता त्या संधीचा फायदा उठवत बहरामखानाने तो एकदम छापा घालुन काबीज केला. घनघोर लढाई झाली मात्र हेमू त्याच्या ‘हवा’ नावाच्या हत्तीवर बसुन लढत असताना त्याच्या डोळ्याला बाण लागला व तो जखमी झाला आणि आपल्याला दुसरा कोणी पुढारी नाही हे पाहुन त्याचे लोकही पळुन गेले. मुघल सैन्याचा पानिपतावर दुसरा विजय झाला. जखमी हेमूला अकबरासमोर आणण्यात आले. बहरामखानने त्याचा शिरच्छेद केला.
हेमू हा काही फार मोठ्या घराण्यातील नव्हता पण, स्वपराक्रमाने त्याने कर्तृत्व सिद्ध केले होते. तो मुघलांपूर्वी दिल्लीवरचा शेवटचा हिंदू राजा ठरला. यानंतर मुघल पुढची ३०० वर्षे सत्तेत अधिक्रुतरित्या होते.
दुर्दैवाने हेमूसारख्या पराक्रमी सेनानीचे नाव कुठे दिसत नाही. त्याचा पानिपतावरील पराभव दिसतो मात्र मुघलांविरूद्ध जिंकलेल्या २२ लढायांचे स्मरण होतच नाही ही एक आपल्या इतिहासाची शोकांतिका आहे.
main qimg 2af169b110c7bf677c8c941558fd30dd
अकबर.
संदर्भ: मुसलमानी रियासत – रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई.
धन्यवाद ।

 

साभार – ओंकार ताम्हनकर (Omkar Tamhankar), इतिहास अभ्यासक

1 Comment