खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग १२ | धनाजी नाना चौधरी यांचे आगमन

By Discover Maharashtra Views: 2653 3 Min Read

खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग १२ | धनाजी नाना चौधरी यांचे आगमन –

पुर्व खानदेशात धनाजी नाना चौधरी यांचा प्रभाव राहिला. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील खिरोदा या गावातील धनाजी नाना चौधरी यांनी  १६ जून १९३० रोजी पोलीस अधिकारी पदाचा राजीनामा देऊन ते राष्ट्रीय कार्यात उतरले. खानदेशात पोलीस भरती तसेच सैन्य भरती विशेषतः पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जबरदस्तीने केली जात होती. लोक भरतीच्या भितीने लपून बसत. पण इंग्रज जबरदस्तीने पकडून घेऊन जायचे अशा सुरस कथा गावागावात ऐकायला मिळतात. भालचंद्र नेमाडे यांच्या “कोसला” या कादंबरीत कणगीत लपून बसलेल्या वडीलांचा उल्लेख केला आहे.(खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग १२ – धनाजी नाना चौधरी)

धनाजी नाना यांचा राजीनामा ही महत्त्वाची घटना होती ज्यायोगे जळगाव जिल्ह्यातील राजकारण आणि समाजकारण यांना महत्वाची दिशा आणि बैठक मिळाली. वकिलांनी राजीनामे दिले पण पोलीस अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय कार्यासाठी राजीनामा देण्याची घटना महत्वाची होती.नोकरीतून मुक्त झाल्यावर ते सविनय कायदेभंग चळवळीत सहभागी झाले.सत्याग्रह आणि खादी निर्मितीचे, सुतकताईचे प्रशिक्षण घेण्यासाठी ते विलेपार्ले येथे दाखल झाले. साहजिकच मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या अहवालानुसार धनाजी नाना यांचेवर पोलिसांनी कडक  नजर ठेवली होती.

बॅ. जमनालाल मेहता, वामन काबाडी,नरभोराम नरसी पोपट, आचार्य यांचेबरोबर ते प्रचार कार्य करीत.

आंदोलन ओसरल्यावर चौधरी यांनी जानेवारी १९३१ साली साबरमती आश्रमात जाऊन रचनात्मक  कार्य आरंभ

करण्यासाठी सरदार पटेल आणि जयरामदास दौलतराम यांचे आशिर्वाद घेतले. साबरमती आश्रमाचा आदर्श समोर ठेवून त्यांनी  १९३१ मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर खिरोदा येथे आश्रम काढला. अस्पृश्यता निवारण, ग्रामसफाई, खादी, ग्रामोद्योग, राष्ट्रीय जागृती आणि आत्मनिर्भरतेचे धडे ते जनतेला देऊ लागले. या आश्रमामुळे खेड्यातील जीवन एका प्रकारे ढवळून निघाले आणि चैतन्य, प्रेरणा, आत्मकेंद्रित समाज , देशातील घडणाऱ्या घडामोडींशी जोडला गेला. याचा प्रत्यय सविनय कायदेभंगाचे दुसऱ्या पर्वात आला. दोन हजार वस्ती असलेल्या गावातील १९३२-३३ मध्ये ७५ सत्याग्रही तुरूंगात गेले.  त्यात पाच देशसेविका स्रिया होत्या हे महत्त्वाचे आहे. जनजागृतीचे ते द्योतक होते आणि परिसरातील प्रेरणास्थान सुध्दा होते. पुढे १० जानेवारी १९३२ मध्ये  सरकारने खिरोदा आश्रम जप्त केला आणि १४ जानेवारी रोजी धनाजी नाना यांना अटक केली. कारागृहातून सुटका झाल्यावर विनोबा भावे यांनी खिरोदा आश्रम येथे भेट दिली आणि चौधरींचे कौतुक केले.  जमनालाल बजाज यांनी चौधरी यांना जिवन वेतन आणि कार्यक्षेत्र उपलब्ध करून देण्यासाठी वर्धा येथे बोलविले होते. तथापि खिरोदा परिसरातच राहुन राष्ट्रीय कार्य करण्याचे त्यांनी सोडले नाही.

अस्पृश्यांबरोबर सहभोजनाचे कार्यक्रम त्यांनी खिरोदा येथे यशस्वी करून दाखवले. १९४० मध्ये त्यांनी आपल्या  तिकीट लावून हरीजन सहभोजनाचा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला तर आश्रमाच्या स्थापनेनंतर  सहभोजन आणि अस्पृश्यता निवारण करण्यास चालना मिळाली. सवर्ण व अस्पृश्य  यांच्या पंक्तीला महार लोकांनी वाढप्याचे काम केले. हे उपक्रम आता आज जरी साधे वाटत असले तरी तेव्हा क्रांतीकारी आणि  अभिनव असेच होते.

स्वातंत्र्य, अस्पृश्यता निवारण,खादी ग्रामोद्योग,स्वदेशी, मद्यपान निषेध, लोकशिक्षण,ग्रामसफाई,गाव परिसरात सौंदर्य या बाबींवर त्यांनी कटाक्षाने लक्ष दिले. कराची काँग्रेसचे १९३१ मध्ये भरलेल्या अधिवेशनात ते जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून निवडले गेले. आणि काँग्रेसचा जोरदार प्रचार केला.

आजच्या काळात जेव्हा हा समाज फक्त आपल्या जमातीपुरता विचार करतो, तेव्हा हा राष्ट्रीय नेता नक्कीच प्रेरणादायी आहे.

माहिती साभार –

Leave a comment