महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,75,308

खानदेशातील भिल्ल भाग ८ | भिल्लांचा इतिहास

By Discover Maharashtra Views: 2139 6 Min Read

खानदेशातील भिल्ल भाग ८ | भिल्लांचा इतिहास –

भिल्लांचे स्वातंत्र्यकाळातील उठाव समजून घेण्यासाठी आधी भिल्लांचा थोडा पुर्वोतिहास समजून घेणे आवश्यक आहे. जे मूळ निवासी सततच्या बाह्य आक्रमणांमुळे कसकशे स्थलांतरीत झाले आणि कुठल्या परिस्थितीत एक गुन्हेगार, चोर, दरोडेखोर जमात म्हणून गणले गेले जाते आहे हे समजून घेणे म्हणजेच खरा लोकोइतिहास समजणे होईल.(खानदेशातील भिल्ल भाग ८ | भिल्लांचा इतिहास)

भिल्लांच्या शाखा –

सातपुडा पर्वतात लहान-मोठ्याअनेक नद्या उगम पावतात पण प्रमुख नद्या ह्या तापी आणि नर्मदेच्या खोऱ्यातील प्रदेश हा भिलवाड म्हणजे भिल्लांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. इतिहासातील या प्रदेशाची सीमा बरीच मोठी होती. सातपुडा पासून विंध्य, अरवली, पर्वतांच्या रांगांपर्यत म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान या भागातही हा प्रदेश पसरलेला होता. शबर, किरात, निषाद या नावाने ओळखले जाई. हे लोक दुसरे तिसरे कुणी नसून भिल्लच होते.

महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे जळगाव आणि अजिंठा वेरूळ पर्वतरांगातील भिल्ल जमातीचा व तिच्या उपशाखा यांचा विचार करावा लागतो. महाराष्ट्रात वायव्येस नंदुरबार आणि धुळे जिल्हा तर उत्तरेला मध्यप्रदेशातील निमाड प्रांत पश्चिमेला गुजरात येथील भडोच व सुरत जिल्हे दक्षिणेकडे नाशिक जिल्हा व पुर्वेस जळगाव जिल्ह्यातील सीमा आहेत. या जिल्ह्यातील उत्तरेस सातपुड्याच्या उंचच उंच रांगा, दक्षिणेकडे नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीचा माळमाथा तर या सर्व डोंगराच्या कुशीत तीन मुख्य भाग पडतात. एक जंगल आणि डोंगराच्या अक्राणी, अक्कलकुवा व तळोदा येथील काही भाग तर जळगाव जिल्ह्यातील यावल, रावेर चोपडा तालुक्यातील सातपुड्याच्या काही रांगा, दुसरा सधन तापी खोऱ्यात नंदुरबार, शहादा, शिरपूर, सिंदखेडा आणि तळोद्याचा काही भाग होय. तिसरा भाग धुळे,साक्री व शिंदखेडा येथील सखल भाग होय.

“महादेवाने जिचे प्रियाराधन केले अशा एका विलक्षण स्रीपासून भिल्लांची उत्पत्ती झाली आणि भिल्लांची वंशवेल सुरू झाली.” अशी एक कथा आहे तर दुसरी म्हणजे “महादेवाची मानवपत्नी पहाडकन्या हीला अनेक मुलं झाली. त्यापैकी बसक्या नाकाच्या एका मुलाने आपल्या वडिल महादेव यांच्या नंदीला मारून टाकले. महादेवाला त्याचा राग आला व त्याने त्या मुलास जंगलात सोडून दिले. तो भिल्लांचा मूळ संस्थापक होय.”

रामायण, महाभारतापूर्वीच्या काळात भिल्ल हेच मूळ रहिवासी आहे पण तेथून त्यांचे अनेक भागात स्थलांतर झाले असे दिसून येते. संस्कृत मध्ये मूळ रहिवासी यांचा वल्कलधारी असा उल्लेख आढळतो. ते प्रामुख्याने टेकड्यांवर, दऱ्याखोऱ्यात राहतात याचे मुख्य कारण म्हणजे सखल आणि सुपीक भागातून आर्यांनी त्यांना हाकलले. (तारपा २००१, भिल्ल आदिवासींची कहाणी, भगतसिंग पाडवी, आदिवासी एकता परिषद, मुंबई विभाग, पृ.२९-३१)

अजून एक वैशिष्ट्य लोककथा सांगितली जाते ती म्हणजे पाषाणयुगात घुंगरू नसल्याने बेनी हेजाह राजा फानटा व गांडा ठाकूर यांनी जिवंत कोंबडीची पिल्ले म्हणजे पिसले पायात बांधून गावदिवाळीत नाचले. म्हणजे पाषाण युगात भिल्ल होते असा निष्कर्ष डॉ.गोविंद गारे यांनी काढला आहे. (सातपुड्यातील भिल्ल ऐतिहासिक आणि सामाजिक मागोवा काॅन्टिनेंटल प्रकाशन पुणे द्वितीय आवृती २०१९)

एकेकाळी भिल्ल शक्तीशाली होते. त्यामुळे राजपूत राजे त्यांचा आदर करीत. भिल्ल व राजपूत दोन्ही सारखेच लढवय्ये व शूर असल्याने एकमेकांचा आदर करीत. समाजात त्यांचा आदर होता आणि दबदबा होता हे एन्थोवन या समाजशास्रज्ञाच्या अभ्यासातून स्पष्ट होते. बऱ्याच राजपूत संस्थानामध्ये त्यांच्या राज्याचा उत्तराधिकारी म्हणून नेमणूक झाल्यावर राजपूत भिल्लांचा अंगठा आणि पायाचे बोट यांच्या रक्ताचा टिळा लावत. भिल्लांच्या राजनिष्ठेचे ते प्रतिक होते. भिल्ल जेव्हा भारतात सर्वशक्तिमान होते तेव्हा ही आठवण म्हणून प्रथा असावी. पुढे मात्र ती बंद पडली “खालच्या जमातीचे रक्त” कपाळाला लावणे त्यांना कमीपणाचे वाटू लागले. एन्थोवनच्या मते “भिल्लांचे इतिहासातील समाजशास्त्रीय दर्जाचा विचार करत असतांना भिल्लांना आपला आत्मसन्मान टिकवता आलेला नाही”. ब्रिटीश सरकार भिल्लांच्या हक्कांच्या आड येत होते म्हणून त्यांनी संघर्ष आरंभिले. तसेच तंट्या भिल्ल, भिल्ल वीरांत खाज्या नाईक, भागोजी नाईक अशी बरीच नावे आहेत.

आदिवासी संस्थानांत मौखिक परंपरेने डाब “दाब” हे भिल्लांच्या राज्य आहे पण तो नक्की कुठला प्रदेश हे कळत नाही तर तत्कालीन हिडींबा प्रदेश म्हणजे आजचे अक्कलकुवा परिसरातील मेवासी संस्थाने असे म्हटले जाते. अक्काराणी जी सातपुड्याच्या वसतीला आली हळदीघाटीच्या लढाईनंतर जी महाराणा प्रताप यांची बहिण म्हटली जाते. म्हणून हा प्रदेश अक्राणी महल म्हणून ओळखला जातो. ही काळाची प्रचंड दरी लक्षात घेऊन प्राचीन, , पुर्वमध्ययुगीन, मध्यमयुगीन हा सगळ्या काळातील नीट अभ्यास करून पट मांडण्याची गरज आहे आणि त्याशिवाय खानदेशचा इतिहास नीटसा कळणार नाही.

दुसरा एक उल्लेख मौखिक कथांमधून आढळतो तो म्हणजे मोतिया भिल्ल उर्फ मथा भिल्ल याचे राज्य असल्याचा उल्लेख आहे.त्याचा आनंददेवने याने कपटाने वध करून त्याचे धड ज्या ठिकाणी पुरले त्या मतवार परिसरात नााारण धडगाव करण्यात आले. इ.स. १८१८ पर्यंत हा परिसर अक्राणी धडगाव परगण्याचा भाग होता मतवारचा राणा भाऊसिंग यांनी ब्रिटीश सरकारने २८६६ रूपये तनखा देऊन खालसा केले.

अक्राणी व धडगाव ही संस्थाने होती. या संस्थानांत काठी, गंठा, सागबारा, रायसिंगपूर, सिंगनूर, नाला, भांगरपाणी, आमोदा किंवा फत्तेपूर, हरिपूर सजठाण ही संस्थाने येतात तर यांचा मेवासी, लारिया, सागबारा तळोदा हा भाग आहे. सातपुडा हा अमरकंदापासून तापीच्या मुळापर्यंत पसरलेला आहे.

सातपुड्याच्या कुशीत या भिल्लांची संस्थाने कुलनामाच्या परंपरेनुसार आहेत.

१ पाडवी – बुधावल, सिंगनूर, सजठाण, भगदरी, काढी, नाला

२. वसावे- गंढा, सागबारा

३ वळवी – रायसिंगपूर

४ नाईक- भागरापाणी, आमदा, मोरआंबा ही होय.

माहिती संकलन  –

1 Comment