महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

२२ ऑक्टोबर ऐतिहासिक दिनविशेष

By Discover Maharashtra Views: 3565 6 Min Read

२२ ऑक्टोबर ऐतिहासिक दिनविशेष.

२२ ऑक्टोबर इ.स.१६७९

२२ ऑक्टोबर ऐतिहासिक दिनविशेष – मराठ्यांना खांदेरीला रसद पुरवण्याचा मार्ग मोकळा होता. २२ ऑक्टोबर रोजी राजापूरहून आलेली मराठ्यांची आणखी ३७ गलबते नागावच्या दलात सामील झाली. मराठे सैन्य वाढवीत होते त्या अर्थी ते लवकरच निकाली लढाई करतील असे केग्विनला वाटत होते. पुढील दहा दिवस मात्र मराठ्यांचा एक वेगळाच बेत चालला होता. इंग्रज रिव्हेंज आणि फोर्च्युन घेवून मराठ्यांच्या भीतीने खांदेरीच्या आसमंतापासून दूर रहात होते. याचा फायदा घेवून मराठे आपल्या लहान नौकांच्या आधारे रोज खांदेरीला रसद पुरवीत होते. केग्विनला रोज ५-७ नौका खांदेरीला जाताना अथवा येताना दिसत, मग इंग्रज सैन्य आपले मचवे त्यांच्या पाठीमागे पाठवत असत, पण त्या होड्या त्यांना चकवत व नागावच्या खाडीत पळून जात असत. इंग्रज खाडीत शिरत नव्हते कारण तो संपूर्ण प्रदेश मराठ्यांचा होता व खाडीत शिरल्यानंतर जर खाडीच्या मुखावर मराठ्यांनी हल्ला करून मार्ग बंद केला असता, तर इंग्रजी आरमार आयतेच अलगद मराठ्यांच्या हाती लागले असते. मराठ्यांचा खांदेरीला पुरवठा, इंग्रजांचा त्यांचा पाठलाग आणि मराठ्यांनी त्यांना चुकवणे किंबहुना बऱ्याचदा तर इंग्रजांना पिच्छा करायला लावून आपल्या जाळात अडकवणे आणि दूर नेवून एखादा मचवा पकडणे हा मराठ्यांचा व्यवसाय अगदी व्यवस्थित सुरु होता. गनिमी काव्याचा हा सागरावरील केलेला बहुदा हा पहिलाच प्रयोग असावा ! .इंग्रज या रोजच्याच उपद्व्यापामुळे जेरीस आले. केग्वीन या त्रासाने वैतागला आणि त्याने १ नोव्हेंबर १६७९ रोजी मुंबईला जे इतिहासप्रसिद्ध पत्र लिहिले त्याचा हा सारांश –

“नागाव नदीच्या मुखाशी नौका ठेवण्याच्या बेताविषयी गेल्या पत्रात आपल्याला कळवले होते त्याप्रमाणे दिवसा ते शक्य नाही आणि रात्री चंद्र मावळेपर्यंत गस्त देऊनही उपयोग नाही कारण शत्रूची गलबते उशिराने येतात व वल्ही मारण्यात त्यांची शिताफी अधिक असल्यामुळे त्या आमच्या हाती लागत नाहीत. आम्ही त्रस्त आहोत. त्यांना अडविण्याच्या बाबतीत आम्ही कसलीही कसूर होऊ देत नाही याची आपण शाश्वती बाळगावी परंतु त्या लहान सरपटणाऱ्या होड्या आम्हाला आश्चर्यकारक रीतीने चकवतात.आता आम्हाला असे वाटू लागले आहे की आमच्या कडेही तसल्या होड्या असतील तर आम्हाला कदाचित मदत होवू ही शकेल …”

ज्या इंग्रजांना अगोदर वाटले होती की मराठ्यांच्या लहान होड्या आपण काही मोठी गलबते नेवून आरामात बुडवून टाकू तेच इंग्रज आता वरील पत्र लिहीत होते या वरून मराठ्यांचा निग्रह, त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी आणि त्यांची अनोखी युद्धनीती दिसून येते. गनिमी काव्याचा वापर करून ज्या मराठ्यांनी आजवर शत्रुसैन्याला डोंगर-दऱ्यांमधे जेरीस आणले होते त्यांनी तीच युद्धनीती सागरावर अवलंबून बलाढ्य सागरी सत्तेला जेरीस आणले होते.

२२ ऑक्टोबर इ.स.१६८२

जानेवारी इ.स. 1682 च्या जानेवारी महिन्यात शंभुराजे जंजिरा मोहिमेत गुंतले होते. दक्षिणेत आलेल्या औरंगजेबाला स्वराज्यावर चालून जाण्यासाठी ही सुवर्णसंधी वाटली.22 मार्च ला औरंगाबाद येथे आलेल्या औरंगजेबाने आपला पुत्र आझमशहा आणि दिलेरखान यांना दक्षिणेकडे अहमदनगरला रवाना केले. तर शहाबुद्दीनखानाला नाशिक भागाकडे पाठवले.तर रणमस्तखान याला स्वतंत्र सैन्य देऊन त्याची रवानगी कोकणात करण्यात आली. राजपुत्र आझमनेही आदिलशाही प्रदेशावर आक्रमण करण्यासाठी १६८२ च्या जून महिन्यात अहमदनगरहुन कूच केले.या स्वारीत त्याने धारूर जिंकून घेतले.आणि पुढे त्याने मराठ्यांच्या राज्यात प्रवेश केला. याच स्वारीत १६८२ च्या ऑक्टोबर महिन्यात राजपुत्र आझमशहाने सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरच्या उत्तरेस 16 मैलावर  असणाऱ्या टेंभुर्णी येथे आपली छावणी केली होती. आझमशहाने टेंभुर्णी येथे आपली छावणी केली.

२२ ऑक्टोबर इ.स.१७६४

मोगल सम्राट दुसरा शाह आलम, त्याचा वजीर व अयोध्येचा (अवध किंवा औंध) सुभेदार शुजाउद्दौला व बंगालच्या सुभेदार मीर कासिम यांची संयुक्त आघाडी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यात बक्सार गावापाशी झालेली लढाई. बक्सार बिहार प्रातांत पाटण्याच्या पश्चिमेस सु. १२० किमी. वर गंगा नदीच्या दक्षिण तीरावर वसले आहे.

२२ आॅक्टोबर इ.स.१९००

महान भारतीय क्रांतिकारी अशफाक उल्ला खान जयंती

अशफाक उल्ला खान भारतीय स्वातंत्र्यलढ्यात एक प्रमुख क्रांतिकारक होते.  काकोरी घटनेत त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.  ब्रिटीश सरकारने त्यांच्यावर खटला चालविला आणि १९ डिसेंबर १९२६ रोजी त्याला फैजाबाद तुरूंगात फाशी देण्यात आली.  राम प्रसाद बिस्मिल प्रमाणे अशफाक उल्ला खानही उर्दू भाषेचे एक महान कवी होते. त्यांचे उर्दू तखालस, हिंदीमध्ये टोपणनाव होते, हसरत होते. उर्दू व्यतिरिक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेतही त्यांनी लेख आणि कविता लिहिल्या. अशफाक उल्ला खान खान वारसी हसरत असे त्याचे पूर्ण नाव होते.  भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या संपूर्ण इतिहासामध्ये बिस्मिल आणि अशफाक यांची भूमिका निर्विवादपणे हिंदू-मुस्लिम ऐक्याची एक अनोखी गाथा आहे.

२२ ऑक्टोबर इ.स.१९४३

राणी झांशी रेजिमेंटची स्थापना

२१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापूर येथे नेताजींनी ‘आझाद हिंद सरकार’ या नावाने स्वतंत्र भारताचे सरकार स्थापन करण्याची घोषणा केली. नेताजी स्वत: या सरकारचे अध्यक्ष आणि पंतप्रधान होते. या सरकारला नऊ देशांनी मान्यता दिली. २२ ऑक्टोबर १९४३ रोजी राणी झांशी रेजिमेंटची स्थापना करण्यात आली. आझाद हिंद सैन्याला संघटित करुन त्यांना शस्त्रास्त्र आणि इतर मदत मिळायला सुरुवात झाली. ब्रह्मदेशामधून सरकार काम करत होते. नोव्हेंबर १९४३ मध्ये जपानने अंदमान आणि निकोबार ही दोन बेटे नेताजींकडे सुपूर्द केली. अंदमान आणि निकोबार या बेटावरुन नव्या सरकारचे कामकाज सुरु झाले.

२२ ऑक्टोबर इ.स.१९४७

मांगरोळ आणि बाबरियावाड भारतात सामील

जुनागडशी संलग्न असलेल्या माणावदर, मांगरोळ आणि बाबरियावाड या तीन लहान जहागिरी ताब्यात घेण्याचा २१ ऑक्टोबरला मंत्रिमंडळाने निर्णय घेतला. खरे तर, मांगरोळ आणि बाबरियावाड यांनी भारतात सामील होण्याचा निर्णय आधीच घेतला होता. मात्र, मांगरोळचा शेख सामिलीकरण करारावर सही केल्यानंतर बराच दबावात होता. नवाब आणि पाकिस्तानचे म्हणणे होते की, संलग्न राज्याला सामिलीकरणाबद्दलचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. परंतु सरदार पटेल त्यांच्याशी सहमत नव्हते. माणावदरच्या खानने भारतात सामील होण्याचा निर्णय घेतला नव्हता. उलट त्याने स्थानिक नेत्यांना अटक केली. यामुळे लोकांमध्ये त्याच्याविरुद्ध संताप पसरला. अखेर २२ ऑक्टोबरला भारताने माणावदर ताब्यात घेतले. मांगरोळ आणि बाबरियावाड १ नोव्हेंबरला ताब्यात आले.

Leave a comment